Nana Patole Google
विदर्भ

Nana Patole on Government : नालायक, बधिर सरकारला जनताच धडा शिकवेल

Atul Mehere

Nagpur Political News :राज्य सरकारनं अद्यापही दुष्काळ जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कमही जमा झालेली नाही. त्यामुळं यंदा शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. काँग्रेसकडून सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात येत आहे. राज्यातील आणि केंद्रातील सरकार नालायक आणि बधिर झालंय. आता जनताच त्यांना धडा शिकवेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.

नागपूर येथे गुरुवारी (ता. ९) प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. देशाच्या आणि राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळानं जनतेला दिलासा द्यायचा असतो. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये तर कोणत्याही मुद्द्यावर एकवाक्यता नाही, असं पटोले म्हणाले. (Congress State President Nana Patole Criticize Government at Nagpur for not helping farmer's)

सरकारमधील एकाचा मंत्री एक घोषणा करतो, तर दुसरा मंत्री वेगळच बोलतो. मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसेल आणि मतभेद असतील तर बळजबरीनं मंत्रिमंडळात राहायचं तरी कशाला, असा सवाल आमदार पटोले यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आक्रोश आहे. जातीजातींमध्ये वणवा पेटलाय. परंतु सरकारला त्याचं काहीही देण-घेणं नसल्याची टीका त्यांनी केली.

राज्य जळत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतेय. ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्यात आलाय. त्यामुळं मूळ प्रश्नाकडंच लक्ष भरकटविल्या जात आहे. राज्यात अडीच लाख पदं रिक्त आहेत. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण झालय, परंतु सरकारमधील मंत्री केवळ स्वत:ची खुर्ची कशी वाचेल, याचाच विचार करण्यात मग्न असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार ओबीसी समाजाचं नुकसान करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देऊ. परंतु बोलण्यात आणि कृतीत अगदी फरक आहे. त्यामुळं सरकारच्या मनात काय सुरू आहे हे जनतेला कळलं पाहिजे. भाजपला मुळात देशातील आरक्षणच संपवायचंय. त्यामुळं ते जातीनिहाय जनगणनेला विरोध करताहेत. बिहारमध्ये अशी जनगणना झालीय. ती संपूर्ण देशात करून त्या आधारावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

जेलमध्ये बसलेल्या बगलबच्चांना सरकार मुबलक सुविधा देत आहे. हे फक्त येरवडा तुरुंगात सुरू आहे असं नाही. देशभरात हा प्रकार चाललाय. राज्य आणि केंद्रातील सरकार हे गुन्हेगार, माफियांना संरक्षण देणारं सरकार आहे. केंद्राच्या काय अन‌् राज्याच्या काय गृहविभागाचा वचकच संपलाय. त्यामुळं चोरांना सोडून सरकार सामान्य जनतेवर लाठ्याकाठ्या उगारत आहे. मराठा समाजावरही याच सरकारच्या पोलिसांनी लाठीमार केला, याचं स्मरणही पटोले यांनी करून दिलं.

यशवंतराव चव्हाण केंद्रात आगामी निवडणुकीबद्दल चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेटही झाली. आम्ही पाच राज्यांतील निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू करू. अद्याप कोणत्याही मुद्द्यावर एकमत झालेलं नाही किंवा निर्णय झालेला नाही. कोणताही निर्णय झालेला नसताना उगाच हवेत गोळीबार करण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणूक लढण्याबाबत एकमत झाल्यानंतर सर्वांना कळेलच, असे आमदार नाना पटोले यांनी सांगितलं.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT