Gadchiroli Conrgess Protest.
Gadchiroli Conrgess Protest. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : गडचिरोलीत सत्ताधाऱ्यांविरोधात का पेटू लागले वातावरण?

संदीप रायपूरे

Lok Sabha Election 2024 : नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व आदिवासीबुहल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्या शेतकरी, ओबीसी, बेरोजगार आंदोलन करत आहेत. लोकप्रतिनिधींची अनास्था, प्रशासनाकडून होत असलेली उपेक्षा याला कारणीभूत ठरली आहे. नुकतेच देसाईगंज तालुक्यात शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. या भागात धानाची शेती केली जाते. पण शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या मतदारसंघाचे आमदार कृष्णा गजभे यांनी तीन दिवसांत शेतीला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते फुसके ठरले. याच मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलन स्थळावरून काँग्रेसनेच भाजपला लक्ष्य केले आहे.

आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार कृष्णा गजभे यांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. पिके नष्ट झाल्यावर पाणीपुरवठा करणार का? असा संतप्त सवाल त्यांना करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मध्यस्थी केली. हा प्रश्न सुटला नाही तर स्वतः आपण मोठा मोर्चा काढण्याची ग्वाही वडेट्टीवारांनी दिली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आंदोलन होते न होते तोच ओबीसी युवकांनी 4 मार्चपासून साखळी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींच्या समस्यांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम, जिल्ह्यात ओबीसींचे कमी झालेले आरक्षण हे त्यांचे मुद्दे आहेत.ओबीसी युवकांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संघटनेकडे दिले. आंदोलनात सक्रिय सहभागही घेतला. गडचिरोलीत सध्या विविध मुद्द्यांवरून रोजगार, शेतकरी, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी संतापले आहेत. मोठा अन्याय होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती दर्शविली.

महागाई आणि अल्पवेतनामुळे या कर्मचाऱ्यांचा स्वतःसह कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी असो की खासगी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतलेला नाही. उद्योगपतींचे कर्ज सहज माफ केले जाते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा मात्र पैसे नसल्याचे सरकार सांगते. हा अन्यायकारक प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. गडचिरोलीत मोठा विकास सुरू असल्याचा गाजावाजा सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे, पण प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. येथील बेरोजगार, शेतकऱ्यांत कमालीचा संताप आहे. ते आता या मुद्द्यांना घेत रस्त्यावर उतरू लागले आहेत. भाजपच्या लोकप्रतिनिधींना खुलेआम जाब विचारू लागले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT