Congress Allegations Against Election Officials in Maharashtra - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंकवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मॅचफिक्सिंग केली होती, असा थेट आरोप त्यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात एकाच मोबाईल वरून शंभर-शंभर मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ती कोणत्या नियमात केली आणि त्याची शहनिशा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी का केली नाही? असा सवाल उपस्थित करून त्यांनी ही निवडणूक बेकायदेशीर असल्याने रद्द करावी आणि नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी केली. सोबतच त्यांनी भाजपच्या नेत्यांना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करू नये, असा टोलाही लगावला.
नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत गुडधे म्हणाले, ''लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यांच्या कार्यकाळात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ३३ हजार ६१२ मतदार वाढले. यापैकी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची आकडेवारी आपण माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितली. मात्र याची एकत्रित माहिती आपल्याला दिली जात नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी वेगवेगळी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघात एकाच फोन नंबरवरून ४० ते १०० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एकाच घरात शेकडो मतदार कसे काय आले?'' असा प्रश्न गुडधे यांनी उपस्थित केला.
तसेच, एका बुथवर सरासरी ४० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झाल्यास किमान चार टक्के मतदारांची घरघोरी जाऊन फेरतपासणी करावी लागते. शहनिशा करून नोंदणी करावी लागते. तसा नियमच आहे. येथे तोही पाळला गेला नाही. २७८ बुथवर ४०टक्क्यांपेक्षा अधिक मतदार नोंदवले गेले आहे. मात्र एकाही अधिकाऱ्याने आक्षेप नोंदवला नाही, असे सांगून हे सर्व बोगस मतदार असल्याची शंका गुडधे यांनी यावेळी व्यक्त केली.
याशिवाय, मतदानानंतर प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिनिधींना फॉर्म १७ ए दिला जातो. त्यात किती जणांनी मततदान केल्याची आकेडवारी असते. मतदान बंद झाल्यानंतर सरासरी ८ टक्के मतदान वाढले. ही माहिती १७ सी मध्ये नमदू केली जाते. हा फार्म अद्याप मागणी करूनही दिला जात नाही. आता ४५ दिवसांत सर्व डेटा डिलिट करण्याचा कायदा केला. कारण, ही आकडेवारी समोर आली तर मॅचफिक्सिंग केल्याचे उघड होऊ शकते. याच भीतीमुळे कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असल्याचे गुडधे यांनी सांगितले.
याचबरोबर ''निवडणूक आयोगाकडे आम्ही जी माहिती मागवतो ती दिली जात नाही. त्यावर त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे भाजपचे नेते दुसरेच उत्तर देतात. लोकांची दिशाभूल करतात. दक्षिण-पश्चिम विधानसभेची माहिती मागितली असता उत्तर व पश्चिम नागपूरमध्येही मतदार वाढले, तेथे तुमचेच उमेदवार निवडून आले असे सांगितले जाते. मात्र नेमकी मागितलेली माहिती दिली जात नाही. भाजपने खरंच प्रामाणिकपणे निवडणूक जिंकली असले तर माहिती उपलब्ध करून देऊन आम्हाला उघडे पाडावे. पराभव झाला असले तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे. मात्र माझा पराभव नैसर्गिक नाही. म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे गुडधे यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.