Devendra Fadnavis on Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : कितीही उद्योग आले तरी... उपमुख्यमंत्र्यांनी शब्दच देऊन टाकला!

संदीप रायपूरे

Gadchiroli : महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या गडचिरोलीत अनेक प्रकल्पांमुळे तरूणाईच्या हाताला मोठा रोजगार मिळाला आहे. आता तर गडचिरोली मोठे स्टिल हब होणार आहे. गडचिरोलीच्या तरुणाईला त्यांचे स्वन साकारण्याची मोठी संधी आता मिळणार आहे. अशात कितीही उद्योग येत असले तरी येथील पर्यावरण, जंगल व आदिवासी संस्कृतीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिला.

गडचिरोलीत गेल्या काही दिवसात विकासाची परिभाषा बदलली आहे. येथील तरूणाई आता अधिक सहजपणे नव्या संधी येथेच शोधू लागली आहे. माओवादाने गडचिरोलीच्या विकासाचा वेग थांबला होता. आता येथील तरुण प्रगतीसाठी धाऊ लागले आहेत. त्यांना आता कुणी थांबवू शकणार नाही. गडचिरोलीतून निर्माण झालेली ही परिवर्तनाची लाट खरोखरच अलैकिक, अतुलनीय आहे. तरूणाईतील हा जोश विकासाला मोठी चालना देणारा ठरणार आहे, असे ते म्हणाले.

गडचिरोलीत आयोजित महामॅराथान स्पर्धेला त्यांनी उपस्थिती नोंदविली. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. नक्षल सेलचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या प्रभावी नियोजनातून तरूणाईला नवी उमेद देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

पोलिसांच्या या मोहिमेअंतर्गत गडचिरोलीतील अनेक तरूणांना राज्यातील विविध कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्रात भेट घडविण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील माहितीचे अद्ययावत ज्ञान त्यांना मिळावे, यासाठी अनेक ठिकाणी भेटीगाठी घडविण्यात आल्या. याच उपक्रमाचा भाग म्हणून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मॅराथान स्पर्धा घेण्यात आली. मॅराथॉनप्रसंगी फडणवीस यांनी मागदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस यांनी आपल्या भाषणातून तरुणाईत जोश भरला. त्यांनी स्वत: महामॅराथान स्पर्धेत सहभाग घेतला. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धर्मराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजभे यावेळी उपस्थित होते. गडचिरोली राज्याचे शेवटच्या टोकावरील जिल्हा. येथील माओवादाने तरुणांच्या स्वप्नांना चकनाचूर केले. पण आता गडचिरोली कमालीचा बदलत आहे. आता गडचिरोलीची ओळख ही महाराष्ट्राची सुरुवात होणारा जिल्हा अशी झाली आहे, असे फडणवीस म्हणाले. गडचिरोलीत झालेला हा बदल अतिशय ऐतिहासिक असा आहे. गडचिरोली जिल्ह्याला लाभलेल्या अधिकाऱ्यांचे यात मोठे योगदान असल्याचे फडणवीस म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT