Dr. Anil Bonde at Tiosa
Dr. Anil Bonde at Tiosa Sarkarnama
विदर्भ

भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांजवळ चाकू आणि बंदुका होत्या का?

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : शेतकऱ्यांसाठी आज भाजपने किसान जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चानंतर तरी पालकमंत्र्यांना जाग आली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबिले आहे. आजच्या मोर्चात आमच्या कार्यकर्त्यांजवळ काय बंदुका आणि चाकू होते का? मोर्चामध्ये परिस्थितीने खंगलेले शेतकरी आहेत. हे कुणाच्या जिवाला धोका पोहोचवणार आहेत काय, असा प्रश्‍न करीत पालकमंत्र्यांनी येथे पोलिसांचा बंदोबस्त लावून दडपशाही केल्याचा घणाघाती आरोप माजी कृषिमंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

गेल्या वर्षी महावितरणने लावलेले पोल अतिवृष्टीने आडवे झालेले आहेत. ते अद्याप उभे केले नाही. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केलेले नाहीत. पथदिव्यांचे कनेक्शन तोडले. गावंच्या गावं अंधारात आहेत. दिवाळी आधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, यांसह विविध मागण्या घेऊन शहरातील राष्ट्रीय महामार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला, तेव्हा माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांचे खिसे गरम झाले असतील, तर आपल्या मतदार संघातील जनतेकडे लक्ष द्यावे अशी टीकाही डॉ. बोंडे यांनी यावेळी केली.

तिवसा तालुका हा पालकमंत्र्यांचा यांचा मतदारसंघ असतानासुद्धा इथल्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. या भागातील फळबागेचे पंचनामे झाले नाहीत. अतिवृष्टी त्यामुळे खचलेल्या विहिरीचे सर्वेक्षण झाले नाही. पीएम किसान योजनेच्या सर्वेक्षण करणारी यंत्रणा कृषी विभागाने किंवा महसूल विभागाने राबवायची हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. घरकुलासंदर्भात इथलं प्रशासन समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. पालकमंत्री जनता दरबार भरवत नाहीत. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळाले की नाही याची चिंता कुणालाही नाही. त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांच्या व सामान्य लोकांच्या समस्या घेऊन आज आम्ही जन आक्रोश किसान मोर्चा च्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या दारात सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित हा दरबार भरविला, असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.

किमान आता या मोर्चानंतर तरी पालकमंत्र्यांना थोडीशी तरी जाग येईल. जर का खिसे गरम झाले असतील तर लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी टीका मागणी त्यांनी केली. पालकमंत्री शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात बोंडे यांनी केला. दुर्दैवाने शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. नुकसान भरपाईसंदर्भात शासनाने काढलेल्या जीआरमध्ये तिवसा तालुक्याचे नाव नाही. कोणतीच मदत दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नाही. खचलेल्या विहिरींचे, गळलेल्या फळांचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. यंत्रणा कुणी राबवायची, हे सुद्धा सरकारचे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे भाजपने आज हा जनआक्रोश मोर्चा काढला असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT