Uddhav thackray-sharad pawar
Uddhav thackray-sharad pawar Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीत खटके ? शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने उभे ठाकल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) स्वत: मैदानात उतरले आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत देखील सहभाग नोंदवत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र, याचवेळी शिंदे गटाच्या नेत्याने मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

उध्दव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं. यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल देखील केला होता. मात्र, आता शिंदे गटाच्या नेत्याने उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीत बेबनाव असल्याचा मोठा दावा केला आहे.

संजय शिरसाट यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले. मात्र, उद्धव ठाकरे ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत, त्या पक्षाच्या कार्यालयातसुध्दा ते गेले नाही. ते थेट काँग्रेसच्या कार्यालयात गेले. तसेच ठाकरे हे त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे देखील गेले नाही. त्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिल्यामुळे ठाकरे आणि राष्ट्रवादीमध्ये बेबनाव आहे असं मला वाटतं. आणि त्यांचा राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेससोबत राहण्याचा मनोदय असावा असा संशयही शिरसाटांनी व्यक्त केला आहे.

शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं विधान केलं होतं. पण तेच उद्धव ठाकरे आज विधान परिषदेत दाखल झाले आहेत. खरंतर ठाकरे कुटुंब एकदा दिलेला शब्द कधी मोडत नाही. मात्र, त्यांच्यासमोर आज कोणाचं ऐकावं हा प्रश्न आहे. कधी संजय राऊत, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी काँग्रेस, कधी राहुल गांधी अशा द्विधा मन:स्थितीत ते आहेत. म्हणून ते नागपुरात आलेच आहेत तर त्यांचं स्वागत करुयात असाही चिमटा शिरसाटांनी काढला.

''...ते चौथ्या क्रमांकाच्या खाली जाऊ नयेत!''

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात निकालात ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. यावरुन देखील शिरसाटांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी पाहिलं की, ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये ते चौथ्या क्रमांकाच्या खाली जाऊ नयेत अशी ईश्वराकडे प्रार्थना करुयात.

'' ठाकरे गट काँग्रेसच्या चिन्हावर लढणार तर नाही ना? ''

शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीत उध्दव ठाकरेंच्या गटाला चिन्ह भेटलं नाही, तर त्यांचा गट काँग्रेसच्या चिन्हावर तर लढणार नाही ना अशी शंका येत आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे विधानभवनात आले असून ते विधान परिषदेत जाणार आहेत असंही यावेळी शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT