Amol Mitkari On Akola Riots
Amol Mitkari On Akola Riots Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari On Akola Riots : अकोल्यात दोन गटांत राडा; राष्ट्रवादीच्या मिटकरींचा भाजपवर गंभीर आरोप, केली 'ही' मागणी

सरकारनामा ब्यूरो

Akola News : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी आहे. तसेच या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टवरुन या वाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टि्वटद्वारे अकोल्यात उसळलेल्या दंगलीवर भाष्य केलं आहे. मिटकरी म्हणाले, घटनास्थळी अकोला पोलीस एका तासानंतर पोहोचली. पोलिसांनाच ही दंगल घडवुन आणायची होती का? कर्नाटक निकालानंतर संभाजीनगरप्रमाणे भाजपाने अकोल्यात घडवली आहे का याची नि:पक्ष चौकशी गृह विभागाने करावी व आमच्या जिल्ह्यात शांतता कायम ठेवावी.

अकोल्यात रविवारी(दि.१३) मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक होऊन अनेक जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला.घटना घडल्यानंतर ताबडतोब एका पक्षाचे प्रतिनिधी तिथे पोहोचले .कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रातील ही पहिली घटना! सत्ताधाऱ्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केल्याची चर्चा आहे. यावेळी अमोल मिटकरीAmol Mitkari) यांनी या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली.

दंगल घडण्यामागचं कारण काय?

अकोल्यात एका तरुणानं फेसबुक(Social Media)वर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. त्यानंतर पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत असतानाच एक मोठा जमाव हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे रस्त्यावर उतरला आणि त्यांनी उच्छाद मांडण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड करत जाळपोळ सुरू केली. तसेच काही घरंही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला.

या दंगलीत दोन्ही गटातील एकूण 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

गुन्हा दाखल...

अकोला(Akola) शहरातील दोन गटात वाद प्रकरणी हरिहर पेठ परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता राखण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून नागरिकांना केलं जात आहे. तणावाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाशिममधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kukarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT