Narendra Modi and Sharad Pawar
Narendra Modi and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

तोंडावर निवडणुका, अहंकाराची किंमत चुकवावी लागेल; म्हणून मोदी नमले…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : उत्तरप्रदेश आणि पंजाब राज्यांमध्ये निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि तेथे शेतकऱ्यांना सर्वाधिक विरोध मोदींना होतो आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना उत्तर काय द्यावे, या विवंचनेत मोदी सरकार पडले. अहंकाराची किंमत चुकवावी लागेल म्हणून केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली.

श्री पवार १७ नोव्हेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आज ते चंद्रपुरात आहेत. तेथे जिल्ह्यातील उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशभरातल्या राज्य सरकारांना विश्‍वासात घेऊन कृषी संघटनांना विश्‍वासात घेत सगळ्या राज्यातल्या कृषी मंत्र्यांच्या बैठका घेतल्या. चर्चा केली, त्यानंतर केंद्र सरकारने केलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आम्ही केली होती. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे हजारो शेतकरी गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. आज त्यांना यश मिळाले. अखेर मग्रूर मोदी सरकार झुकले, हे चांगले झाले.

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नव्हताच. तो होऊही शकत नाही. संसदेच्या सभागृहामध्ये यावर निर्णय होईल. हे कायदे रद्द करताना गोंधळ होईल, अशी शंका सर्वांच्या मनात होती. पण तसे झाले नाही, हे चांगले झाले. एक वर्षापेक्षा अधिक काळ शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनासाठी बसतात, हा इतिहास घडला. ऊन वारा पावसाचा विचार करत नाहीत. गेले वर्षभर केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरही आम्ही मान्य करणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. त्यानंतर संघर्ष झाला. हे चांगले झाल्याचे पवार म्हणाले.

लढवय्या शेतकऱ्यांना सलाम..

हरीयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आता उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका आहेत. तेथे मोदींना जबरदस्त विरोध सुरू आहे. शेतकरी विचारतील, तर आता उत्तर काय द्यावे, आपल्याला या दोन राज्यांत किंमत चुकवावी लागेल, याची जाणीव झाल्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला. उशिरा सुचलेले शहाणपण आहे. पण हे चांगले झाले मी त्यावर दुःख व्यक्त करणार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांच्या जिद्दीला पवारांनी सलाम केला, त्यांचे कौतुक केले.

त्यांच्याजवळ महाराष्ट्र नाही, म्हणून अस्वस्थ..

महाराष्ट्रासारखं राज्य त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत. आमचे नेते आणि मंत्र्यांच्या चौकश्या करून ते थकले आहेत. लोकशाहीविरोधी काम त्यांनी आजवर केले. कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील सरकारला केंद्रातील भाजप सरकार धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे. अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहे. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. उलट आम्ही अधिक घट्ट झालेलो आहोत. ही आघाडी आता तुटणे नाही. विदर्भाच्या विकासासाठी आमचा विरोधी कधीही नव्हता, राज्य एकत्र ठेवायचे की नाही, हा एक प्रश्‍न स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर होता. मराठी भाषिक एकत्र रहावे, हीच आमची भूमिका होती आणि आजही आहे, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT