Ravikant Tupkar in Yalgaar Yatra Sarkarnama
विदर्भ

Farmer's Protest : तुपकरांचा ‘एल्गार’ म्हणाले, सरकारच्या पायाखाली वाळूही शिल्लक नाही उरणार

जयेश विनायकराव गावंडे

Ravikant Tupakar Flared Up in Shegaon : सरकारनं शेतकऱ्यांच्या समस्यांकडं अत्यंत गंभीरतेनं बघणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला, तर सरकारच्या पायाखालची वाळूही उरणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून तुपकरांच्या एल्गार रथयात्रेला रविवारी (ता. ५) प्रारंभ झाला. त्यावेळी त्यांनी सरकारला शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर होण्याचं आवाहन केलं.

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्यानं पाहण्याची व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना संत गजानन महाराज यांच्या चरणी करीत तुपकर यांनी यात्रेला प्रारंभ केला. दोन दिवस ही यात्रा खामगाव तालुक्यात फिरणार आहे. त्यानंतर ती पुढं मार्गस्थ होईल. (Farmer's Leader Ravikant Tupkar starter Yalgaar Yatra from Shegaon of Buldhana District)

सोयाबीन, कापसाला दरवाढ मिळावी, येलो मोझॅक, बोंडअळीमुळं व पावसात खंड पडल्यानं पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी तुपकर यांची मागणी आहे. शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या मागण्याही त्यांनी लावून धरल्या आहेत. सध्या रविकांत तुपकर यांचं हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. राज्य शासनानं केवळ ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय. इतर तालुक्यांमध्ये शासनाला सर्वत्र हिरवेगार दिसत आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला. सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनानं तातडीनं पूर्ण कराव्यात. गावोगावी शेतकऱ्यांच्या भेटी, बैठक आणि सभा घेऊन शेतकरी व तरुणांची फौज एकत्र करीत या यात्रेच्या माध्यमातून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केलं. केवळ शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या हा एकमेव अजेंडा घेऊन ही यात्रा व हे आंदोलन होणार असल्यानं पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत सर्वच नेत्यांनी या आंदोलनाचा भाग व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुपकर यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. तुपकर यांनी स्वत: कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता हे आंदोलन पुकारल्यानं ते खऱ्या अर्थानं निष्पक्ष व नि:पक्ष आंदोलन असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. राजकीयपेक्षा सामाजिक व शेतीविषय मुद्द्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून तुपकर यांनी हात घातल्यानं त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुणाईचीही मोठ्या प्रमाणावर साथ मिळत आहे. त्यातून सरकारनं काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT