Gadchiroli Bus Sarkarnama
विदर्भ

MSRTC Bus : गडचिरोलीत बस पेटली, भडकली मात्र काँग्रेस; आत्रामांना विचारले ‘क्या हुआ तेरा वादा?’

संदीप रायपूरे

MSRTC Bus : गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या भंगार बसेसमुळे नागरिकात संतापाची लाट आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी नव्या 51 बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अन्न व प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले होते. अनेक दिवस लोटले, पण आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. बसेसअभावी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. यासोबत प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आता हा मुद्दा घेत काँग्रेसने धर्मरावबाबांवर निशाणा साधला आहे. पेटलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल करीत काँग्रेसने आत्रामांच्या साम्राज्यातील मतदारांना भडकाविण्याचा प्रयत्न केला आहे.

गडचिरोलीत एसटी महामंडळाचे दोन आगार आहेत. या दोन्ही आगारातील बसेसची अवस्था पूर्ण भंगार झाली आहे. एकतर बसेसचा अभाव दुसरीकडे नादुरुस्त वाहनांचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. आता तर एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळच होत आहे. एसटीला प्रवाशांचा जीव घ्यायचा आहे काय? असाच प्रश्न केला जात आहे. मुलचेरा-घोट मार्गावर एसटी महामंडळाच्या धावत्या बसने पेट घेतला. चालक-वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. काही दिवसांपूर्वी गडचिरोली-चामोर्शी मार्गावर चालणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचे छतच उडाले होते. हा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजला होता. त्यानंतर गडचिरोलीतील एसटी महामंडळाची दैनवस्था समोर आली आहे. एकेकाळी समृद्ध असलेला अहेरी आगार आता पुरते भंगारखाना झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बसेसची संख्या मोजकीच असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या कमी असल्याने एसटीत प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रवासी व वाहकाची होत असलेली दैना दिसून येते. या व्हिडिओचा आधार घेत काँग्रेसने राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर निशाणा साधला आहे. आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याला 51 नवीन एसटी बसेस देण्याचे आश्वासन दिले होते, पण हे आश्वासनच राहिले. जिल्ह्यात बसेसअभावी प्रवाशांचे हाल होत असताना मंत्री स्वखर्चाने खासगी बसेसद्वारे भक्तांना अयोध्या दर्शन घडवित आहेत. त्यामुळे काँग्रेसने आत्रामांना ‘क्या हुआ तेरा वादा’ असा प्रश्न विचारला आहे. धर्मरावबाबा आत्राम हे राम भक्तांसाठी जे काम करीत आहेत त्यात गैर काही नाही. पण त्यांनी सामान्य प्रवाशांचा पण विचार करावा, असे सांगत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.

चालले मोठे निवडणूक लढायला!

गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्ट केले. लोकसभा मतदारसंघातील 21 तालुक्यांत आपल्या कामांना सुरुवात झाली असल्याची माहिती आत्रामांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आता नेमका हाच मुद्दा घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 20 तालुक्यांचा समावेश होतो, पण आत्रामांना मतदारसंघाची साधी माहिती नाही. मतदारसंघाची माहिती नसताना आत्राम निवडणूक लढायला निघाले आहेत, असे सांगत ब्राह्मणवाडे यांनी आत्रामांना चांगलेच चिमटे काढले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT