Congress Protest in Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Congress : रानटी हत्ती, वाघांचा धुमाकूळ रोखण्यासाठी काँग्रेसचा ठिय्या

संदीप रायपूरे

Chandrapur News : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून रानटी हत्ती व वाघांचा धुमाकूळ सुरू आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात काहींचे प्राणही गेले आहेत. वारंवार निवेदन देऊनही वन विभागातील अधिकारी याची दखल घेत नसल्यानं काँग्रेसच्या वतीनं चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

काँग्रेसने काही दिवसांपूर्वी शासनाच्या विरोधातही आंदोलन केलं होतं. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं चंद्रपुरातील गिरनार चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. (Gadchiroli Congress Protest In Chandrapur For Demand Of Controlling Elephants & Tiger Attacks)

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींची संख्या वाढली आहे. अनेक भागांध्ये वाघही हल्ले करीत आहेत. सुरुवातीला हत्ती पिकांची नासाडी करायचे. आता हत्ती मानवी वस्त्यांमध्येही शिरत आहेत. त्यांनीही हल्ले सुरू केले आहेत. हत्ती आणि वाघांच्या दहशतीमुळं गडचिरोलीतील नागरिक त्रासले आहेत. दोन ते तीन दिवसांआड वाघ मानवी बळी घेत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने यासंदर्भात वन विभाग व स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले. प्रशासनानं त्याची गंभीर दखल न घेतल्यानं गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात आंदोलन करण्यात आलं. या वेळी काँग्रेसचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते.

गडचिरोलीत वन्यजीवांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेती व घराचे पंचनामे करावेत. जाचक अटी न लावता सरसकट किमान 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी. वनपट्ट्याची प्रलंबित प्रकरणं निकाली काढावीत. वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे. वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. हत्ती व वाघाचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था करावी, अशा काँग्रेसच्या मागण्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप जिवांचे बळी जात असताना त्याला आवर घालण्यासाठी प्रशासन हतबल ठरत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली आणि चंद्रपुरातील काँग्रेसच्या या आंदोलनानंतर प्रशासन हत्ती व वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकारामुळं नागरिकांमध्ये रोष आहे. हा रोष प्रशासनानं समजून घेतला पाहिजे, अशी मागणी होत आहे. त्यासाठी नागरिकही स्थानिक पातळीवर पाठपुरावा करी आहेत. वन्यजीवांचा बंदोबस्त न लावल्यास नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढणार असल्याची माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT