Sandip Patil, IPS, Gadchiroli
Sandip Patil, IPS, Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli News: नक्षलवाद्यांची कोंडी करून विविध कारवाया सुरू, त्यांना स्थानिकांचा आधार नाही !

सरकारनामा ब्यूरो

Gadchiroli : गडचिरोलीतील स्थानिक नागरिकांचा आता नक्षलवाद्यांवर विश्‍वास राहिलेला नाही. पोलिस यंत्रणेची उपस्थिती आणि विकास प्रक्रियेला आलेला वेग पाहता नक्षलवादाचा अंत लवकरच होईल, असा विश्‍वास गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

नागपूरच्या सकाळ कार्यालयाला संदीप पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माओवादी कम्युनिस्ट पार्टी अस्तित्वात आल्यानंतर २००४ पासून देशात नक्षल कारवाया वाढल्या. २००९ मध्ये त्यात भीषणता आली. त्यामुळे सरकारने प्रारंभिक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यातून दुर्गम भागात चौक्या स्थापन करण्याचे काम सुरू झाले.

गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांची कोंडी करून विविध कारवाया करण्याचे काम सुरू असल्याने बऱ्यापैकी त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. गडचिरोली भागात सध्या ६० चौक्या कार्यरत आहेत. आता गडचिरोलीऐवजी छत्तीसगड भागात नक्षल्यांचे वास्तव्य आहे. नक्षलवाद्यांचे वास्तव्य संपविण्यासाठी त्या भागात मोठ्या प्रमाणात कारवाईची गरज आहे.

त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गडचिरोलीतील नक्षलवादापेक्षा शहरी भागातील नक्षलवाद अधिक प्रभावी आणि घातक असल्याचे ते म्हणाले. यातील काही बड्या नेत्यांवर कारवाई झाल्याने त्यावर काही प्रमाणात वचक बसला आहे. मात्र, आजही त्यांच्यातील बरेच जण सक्रिय असून, त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे हे यंत्रणेपुढील मोठे आव्हान असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

आंबेडकरांची क्रांती मोठी..

देशात माओवाद रुजविण्यासाठी अनेक बुद्धिजीवी वर्ग सरसावताना दिसतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हाती असामान्य ताकद दिली. ही जगातील सर्वश्रेष्ठ क्रांती आहे. आणखी दुसऱ्या क्रांतीचा विचार करण्याची काय गरज आहे. लोकशाही मूल्यांच्या माध्यमातूनही आपण आपले हक्क मिळवू शकतो, असे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

नक्षलवादाला स्थानिकांचा आधार नाही..

गेल्या काही वर्षांमध्ये गडचिरोलीत (Gadchiroli) कार्य करीत असताना स्थानिकांना सरकारच्या (Government) विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी काम केले. यामध्ये आधारकार्ड, बॅंकेचे खाते आणि त्यातून विविध शासकीय योजना मिळाल्याने विकासकामांना जनतेचीही साथ मिळत आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांनी नक्षलवादाला (Naxal) दूर सारत विकासाला जवळ केल्याचे चित्र दिसून येत आहे, असे संदीप पाटील म्हणाले. याशिवाय तरुणांच्या रोजगारासाठीही पोलिस (Police) प्रयत्नशील असल्याने त्यांची साथ मिळत असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT