Gadchiroli Rice Scam : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत उघडकीस आलेल्या तब्बल 100 कोटी रुपयांच्या कथित धान घोटाळ्याला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.
या घोटाळ्याचा सातत्याने पाठपुरावा करणारे काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या नावानेच बनावट पत्र तयार करून तक्रार मागे घेतल्याचा दावा करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, घोटाळ्यातील संबंधितांना वाचवण्यासाठीच हा डाव रचल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
गेल्या वर्षभरापासून नाना पटोले (Nana Patole) यांनी या धान घोटाळ्याप्रकरणी विविध सरकारी विभागांकडे 70 हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळात जवळपास 4 लाख 48 हजार क्विंटल धानाची तूट आढळल्याचा दावा केला होता. या घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती.
या प्रकरणातील पहिली मोठी कारवाई देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर झाली होती. 2023-24 आणि 2024-25 या कालावधीत संस्थेमध्ये 10 हजार क्विंटल धानाची तफावत आणि 34 हजारांहून अधिक बारदाने कमी आढळल्याने सुमारे 4 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप समोर आला. त्यानंतर उपप्रादेशिक व्यवस्थापक, विपणन अधिकारी, संस्थाध्यक्षांसह 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि अनेकांना अटकही करण्यात आली.
तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर आधारभूत खरेदी योजनेतील गैरव्यवहार उघडकीस आले. चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील 41 राइस मिल मालकांवर 2 कोटी 68 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवणाऱ्या अनेक गिरण्यांना काळ्या यादीतही टाकण्यात आले.
मात्र, या बहुचर्चित प्रकरणाला 1 जून रोजी अनपेक्षित वळण मिळाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एक पत्र सादर करण्यात आले. या पत्रात देसाईगंज येथील 'जय आंबे राइस मिल'विरोधातील तक्रार नाना पटोले यांनी मागे घेतल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
हे पत्र समोर आल्यानंतर नाना पटोले यांनी तीव्र प्रतिक्रिया देत कोणतीही तक्रार मागे घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित पत्रामध्ये त्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली असून बनावट लेटरपॅडचाही वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्रालयाची दिशाभूल करून घोटाळ्यातील संबंधितांना संरक्षण देण्याचा हा गंभीर प्रयत्न असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या बनावट पत्रामागे देसाईगंजमधील एका वादग्रस्त स्थानिक नेत्यासह घोटाळ्यातील काही राइस मिल चालकांचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोलीतील धान घोटाळ्याचा तपास आणि त्यात समोर आलेले बनावट पत्र प्रकरण यामुळे आता केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे, तर पुरावे दडपण्याचा आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला का, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.