Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

भन्नाट कल्पना मांडणाऱ्या गडकरींनी वर्धेत आणला समुद्र; कसा, ते त्यांनीच सांगितले...

अतुल मेहेरे

नागपूर : नवनवीन भन्नाट कल्पना मांडणे आणि त्या प्रत्यक्षात उतरविणे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात ओळखले जातात. आता वर्धा जिल्ह्यात समुद्र आला आहे, असे सांगून त्यांनी भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले आहे. विदर्भात कोठेही समुद्र नाही, त्यामुळे समुद्र आणता कसा येऊ शकतो, असा प्रश्‍न आज प्रत्येकाला पडला आहे. वर्धा जिल्ह्यात समुद्र आला आहे, तो कसा आला ते आज खुद्द गडकरींनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क साकारला जातोय. त्यासाठी जेएनपीटी आणि एनएचएआय (नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया’ यांच्यामध्ये करार झाला. त्याचा सोहळा आज नागपुरात पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते. या सोहळ्याला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती ठाकरे, लॉजिस्टिकचे संचालक सत्यनाथन आणि प्रकाश गौर उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्राय पोर्ट आकार घेत आहे. नागपूर हे देशाचे केंद्रस्थान आहे. येथून देशभरात कोणताही माल पोहोचविणे सोयीचे पडते आणि हा ड्राय पोर्ट पूर्णपणे क्रियान्वीत झाल्यानंतर येथील फळे, भाजीपाला, सूत आदी माल जगभरात कोठेही कमीत कमी वेळात नेता येणार आहे. त्यामुळे येथे समुद्र जरी नसला, तरी हा ड्राय पोर्ट क्रियान्वीत झाल्यानंतर त्याच पोर्टसारखे काम होणार आहे, असे गडकरींनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे जेथे हा पोर्ट तयार होतो आहे, तेथे समृद्धी महामार्ग, नागपूर हैद्राबाद मार्ग आणि नवीन तयार होऊ घातलेला चार पदरी नागपूर - हैद्राबाद मार्गही राहणार आहे. त्यामुळे येथून मुंबई आणि तेलंगणा व आंद्रप्रदेशातही एक्‍स्पोर्ट करणे सहज शक्य होणार आहे. सद्यःस्थितीत मारुती सुझुकी या कंपनीने आपले गोदाम बुट्टीबोरीत बनविले आहे. कारण त्यांच्या लक्षात आले की, नागपूर हे देशाचे केंद्रस्थान आहे आणि येथून देशभरात आपले उत्पादन पोहोचविणे शक्य आहे. ही बाब आजपर्यंत आपल्या लक्षात आली नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गेल्या वर्षी किसान रेल्वे सुरू करून ३५ रेल्वे गाड्या भरून संत्रा बांगलादेशात पाठवला. सिंधी रेल्वे येथील हब सुरू झाल्यानंतर संत्र्याचे ५ ते १० हजार कंटेनर देशाबाहेर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे, असे गडकरींनी सांगितले.

बांगलादेशच्या गृहमंत्र्यांशी झाली चर्चा

आपल्या विदर्भातील संत्रा बांगलादेशमध्ये पाठविला जातो. पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाठविला जाणार आहे. पण तेथे आपल्या संत्र्यावर ७० ते ८० टक्के कर आकारला जातो. यासंदर्भात बांगलादेशच्या गृहमंत्र्यांशी बोलून त्यांना कर कमी करण्याची विनंती केली आहे. ही चर्चा यशस्वी होईल आणि तेथे आपल्याला करात सवलत मिळेल आणि इकडे लॉजिस्टीक कॉस्ट कमी झाल्यामुळे संत्रा उत्पादकांचे उत्पन्न भविष्यात वाढणार असल्याचा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT