Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Gondia Nana Patole News : गोंदियात दिसला ‘जनसंवाद इम्पॅक्ट’; भाजप, मनसे, राष्ट्रवादीतून ४५० कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये !

अभिजीत घोरमारे

Gondia District Congress Political News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यात केलेल्या ‘संवाद यात्रेचा’ इम्पॅक्ट दिसू लागला आहे. गोंदियात काँग्रेसला एकाच दिवशी तब्बल ४५० कार्यकर्ते मिळाले आहेत. आजच्या अस्थिर राजकारणात एवढे कार्यकर्ते एकाच वेळी मिळणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखेच आहे. (Getting so many activists at once is like winning a lottery)

आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या ४५०पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सालेकसा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष रोहित बनोटेसह जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनी आपल्या १०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या तडाख्यातून भारतीय जनता पक्षही सुटलेला नाही. भाजपच्या ५० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे एकट्या राष्ट्रवादीचे ३०० कार्यकर्ते अजित पवार गट सोडून गेल्याने हा प्रफुल्ल पटेलांना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार पाडून नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षात करून घेतलेला कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश हा पाठीत खंजीर खुपसल्याचा बदला असल्याचे बोलले जात आहे. आता या पक्ष प्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाले असून, राष्ट्रवादीची मोठी हानी झाली आहे.

`हे' आहे फुटीचे कारण...

गोंदियात राष्ट्रवादीचे अधिकचे कार्यकर्ते प्रफुल्ल पटेलांवर विश्वास ठेवत अजित पवार गटात सामील झाले. अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र आल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन काम करावे लागले आणि येथूनच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली.

वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्याने आपसी विरोध सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यातही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याचे उघडपणे सांगण्यात येत आहे. याची तक्रार करूनही ज्येष्ठ नेत्यांकडून काहीही उत्तर मिळत नसल्याने आपला कोणी वाली नाही, हे बघून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

नाना पटोलेंनी एक सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात ‘जनसंवाद यात्रा’ काढली. या यात्रेचे नेतृत्व स्वतः नाना पटोले यांनी केले. या यात्रेदरम्यान त्यांनी इतर पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांना बरोबर हेरले. नाराजांना नाना मायेने जवळ करत आहेत, हे वृत्त ‘सरकारनामा’ने तेव्हाच दिले होते अन् झालेही तसेच. नानांच्या यात्रेचा फायदाही काँग्रेसला दिसू लागला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT