High Court orders Bachchu Kadu to vacate the Nagpur protest site by evening amid the ongoing farmers’ loan waiver agitation. Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu MahaElgar : बच्चू कडूंचा महाएल्गार हायकोर्टाने गुंडाळला; फडणवीस सरकारकडून जरांगे पाटील आंदोलनाचा पॅटर्न रिपीट?

Bachchu Kadu MahaElgar : नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Rajesh Charpe

नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली आहे. जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार त्यांनी केला आहे. यामुळे मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेकडो वाहने अडकून पडली आहेत.

अखेर याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची तातडीने दखल घेऊन आजच सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशामुळे नागरिकांना दिलास मिळणार असला तरी कडू यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना कडू यांनी अद्याप आपल्याला न्यायालयाचा आदेश मिळाला नाही, असे सांगितले आहे.

या आंदोलनाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची दखल स्वतःहून उच्च न्यायालयाने घेतली. जनहित याचिका दाखल करून दिवाळीच्या सुट्या असतानाही तातडीने सुनावणी केली. न्यायालयाच्या आदेशात सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास बच्चू कडू यांना बजावण्यात आले आहे.

या आदेशाची प्रत कडू यांना प्रत्यक्ष, ईमेल आणि व्हॉट्‌सअॅपवर पाठवण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशाच्या पालनाचा अहवाल गुरुवारी (ता.३०) सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने नागपूर पोलिसांना दिले आहे. आता यावर कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले आहेत. सुमारे ५०० ट्रॅक्टर घेऊन कडू स्वतः आले आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासूनच वाहतूत कोंडीला सुरुवात झाली आहे. रात्री अनेकांना या आंदोलनामुळे पाच ते सहा तास अडकून पडावे लागले होते. आंदोलकांनी पर्याय मार्गावरही टायरची जाळपोळ केली. समृद्धी महामार्गावरचीसुद्धा वाहतूक रोखली होती. याशिवाय रेल्वे रोखण्याचाही इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पॅटर्न रिपीट केला?

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलकांना फडणवीस सरकारने कुठेही मज्जाव केला नव्हता. मुंबई जाम झाली तरी कुठल्याही आंदोलकाला ताब्यात घेतले नव्हते. अर्थात त्यामुळे आंदोलन चिघळण्याचाही धोका होता. पण शेवटी उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले.

त्याचप्रमाणे नागपूरमध्येही फडणवीस सरकारने कुठेही आंदोलकांना हटकले नाही. मागील दोन दिवसांमध्ये आंदोलकांनी नागपूर शहर जाम केले आहे. 4 महामार्ग बंद पाडले. यावर नागपर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून मोर्चास्थळ 6 वाजेपर्यंत रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांचे आंदोलन हाताळतानाही जरांगे पाटील आंदोलनाचा पॅटर्न रिपीट केल्याचे बोलले जाते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT