BRS Agitation Sarkarnama
विदर्भ

Jivti Chandrapur News : फेरफार बंद असलेला देशातील एकमेव तालुका, आदिवासी-कोलामांसाठी बीआरएसचा आक्रोश !

संदीप रायपूरे

Chandrapur District Political News : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुऱ्यातील राजकारण्यांच्या तीन-तीन पिढ्यांनी सत्ता उपभोगली, पण या विधानसभा मतदारसंघातील जिवती तालुक्यातील सामान्यांच्या समस्या कुणीही सोडवू शकले नाहीत. भारतात जिवती हा एकमेव तालुका असा आहे की, जेथे जमिनीचे फेरफार बंद आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. आता येथील आदिवासी व कोलामांसाठी बीआरएस रस्त्यावर उतरली आहे. (The Human Development Index of Jivati taluka is the lowest)

जिवती तालुक्याचा मानव विकास निर्देशांक सर्वात खाली असल्याचे बीआरएस नेते भूषण फुसे यांनी सांगितले. जिवती तालुक्यातील आदिवासी, कोलाम व शेतकरी बांधवांना हक्काच्या जमिनीचे पट्टे सत्ताधारी मिळवून देऊ शकले नाही. हा अन्याय आता सहन करणार नाही, असे सांगत जिवतीमध्ये बीआरएसच्या वतीने गुरुवारी (ता. १२) आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अद्याप जमिनीचे पट्टे नाहीत

भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी रस्त्यावर येत ‘‘देता की जाता’’असा नारा देत शासन, प्रशासनाविरोधात व सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुरुवारी (ता. १२) आक्रोश मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात हा तालुका येतो. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी व कोलाम समाजाचे बांधव वास्तव्यास आहेत.

तालुक्याची स्थापना होऊन कित्येक वर्षे लोटली, पण अद्यापही त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत. राजुऱ्यातील तीन-तीन पिढ्यांनी या तालुक्याच्या भरवशावर सत्ता भोगली, पण त्यांना आदिवासी, कोलामांचे सामान्य प्रश्न सोडविता आले नाहीत. तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावेत, शेतजमिनीचे फेरफार त्वरित सुरू करावे, तालुक्यात सिंचनाच्या सुविधा निर्माण कराव्यात. जिवती शहरात ग्रामीण रुग्णालय, न्यायालय, बस स्थानक, वसतिगृह, पटांगण, व्यायामशाळा, वाचनालय यांची कामे तातडीने पूर्ण करावीत आदी मागण्यांसाठी बीआरएस आक्रमक झाली आहे.

देता की जाता नारा

या वेळी बीआरएस नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचताच या ठिकाणी सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थितांनी आता ‘देता की जाता’ असा नारा बुलंद करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या वेळी भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभेचे नेतृत्व करणाऱ्यांवर हल्लाबोल केला.

आजही भर पावसाळ्यात नागरिकांना चार चार किलोमीटर अंतर कापून नाल्यातील पाणी प्यावे लागत आहे. जिवतीला सत्ताधाऱ्यांनी बहिष्कृत केले की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिवती येथील समस्या तातडीने सोडविल्या नाहीत, तर याहून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर परंपरागत वेशात नृत्य करून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. जिवती तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासन, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT