Nagpur News, 03 Jul : काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील संत्रा प्रक्रिया कारखान्यावरून आता नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाली आहे. कोर्टाने हा कारखाना ताब्यात घेण्याचे आदेश महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास मंडळाला दिलेत. हा कारखाना तब्बल 30 वर्षांपासून बंद असल्याने भंगार झाला आहे.
सुनीलबाबू, रणजीत बाबू आणि अनिल बाबू अशा तीन दिग्गज नेत्यांनी या परिसराचे नेत्वृत केले असताना हा कारखाना बंद पडलाच कसा? कारखान्याचे मारेकरी कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यावर यापूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते.आता या तीनही बाबूंचे चिरंजीव राजकारणात सक्रिय आहेत. हे बघता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा मुद्दा आता नव्याने गाजणार आहे.
काटोल-नरखेड संत्रा उत्पादकांचा मतदारसंघ म्हणून ओखळला जातो. संत्र्याला रास्त भाव मिळत नसल्याची सर्वच शेतकऱ्यांची ओरड सुरू असते. काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना सुनील शिंदे सातत्याने संत्रा उत्पाकांसाठी आंदोलन करीत होते. याची दखल घेऊन तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी काटोल आणि मोर्शी या दोन मतदारसंघात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा निधी दिला होता.
1991-92 साली आमदार शिंदे यांच्याच देखरेखीखाली हा कारख्यान्याची उभारणी झाली होती. संत्र्याचा ज्युस काढण्यासाठी त्यावेळी अत्याधुनिक मिशनरी यासाठी आणली होती. यावेळी रणजितबाबू देशमुख राज्याचे कृषीमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र 1995 च्या निवडणुकीत सुनील शिंदे यांचा पराभव केला.
अनिल देशमुख यांनी बंडखोरी करून जिल्हा परिषदेतून थेट विधानसभा गाठली होती. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख राज्यमंत्री होते. मनोहर जोशी यांना या कारखान्याच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते.
त्यावेळी आमदार नसल्याने शिंदे प्रेक्षकांमध्ये बसले होते. मनोहर जोशी यांनी त्यांना स्टेजवर बोलावून घेतले. ते येणार नसेल तर मी उद्घाटनच करमार नाही असे त्यांनी जाहीर केल्याने त्यावेळी मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. युतीचे सरकार साडेचार वर्षेच टिकले. राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता आली.
रणजीत आणि अनिल दोन्ही देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. या दरम्यान अलायंस ॲग्रो या कंपनीला हा कारखाना चालवण्यासाठी देण्यात आला. त्यानंतर या कारख्यान्याचे दार उघडले नाही. येथील मशनरी विकण्याचा कंपनीने प्रयत्न केला. सुनील शिंदे यांनी या विरोधात आघाडी उघडली. कोर्टात धाव घेतली.
या प्रकरणी कंपनीच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अटकही करण्यात आली आणि कारखाना सील करण्यात आला. त्यानंतर अनिल देशमुख न्यायालयात गेले. कारखान्याल्या लावलेले टाळे उघडण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली. मध्यंतरी आशिष देशमुख काटोलचे आमदार होते. सध्या भाजपचे चरणसिंग ठाकूर आमदार आहे. अनिल देशमुख यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी पुढची सूत्रे हाती घेतली.
तब्बल 44 सुनावणीच्या तारखांना ते न्यायालयात वैयक्तिक उपस्थित राहिले. न्यायालयाने आता या कारख्यानचे सील काढून तो ताब्यात घेण्याचे आदेश महाराष्ट कृषी औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे. सुमारे 20 वर्षांचा कारखाना व मशिनरी भंगार झाला आहे. फक्त जमीन उपलब्ध आहे. हा कारखाना कोण चालवणार? कोणाला देणार? शेतकऱ्यांचा संत्रा विकत घेतला जाणार का? प्रक्रिया उद्योग सुरू होणार का? या प्रश्नांची उत्तरे सध्या कोणाचकडे नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख यांनी कोर्टाने दिलेल्या निकालाचे सर्व श्रेय घेतले आहे. आता सुनील देशमुख यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सभापती सतीश शिंदे यांनी ‘विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, अखेर काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा' अशी पोस्ट स्व. सुनील शिंदे यांचा फोटो टाकून सोशल मीडियावर टाकली आहे. हे बघता या कारखान्यावरून आता नव्याने राजकारण सुरू होणार असल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.