Lok Sabha Election 2024 Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election: गोंदियातील आठ गावांचं पक्क ठरलंय; 'या' कारणामुळे मतदान करणार नाही म्हणजे नाही...!

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024: पुढील 5 वर्षे देशाची सत्ता कोणाच्या हातात असणार हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागला असून, त्यांनी जोरदार प्रचारालाही सुरुवात केली आहे. निवडणूक कोणतीही असो मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून भरघोस आश्वासन दिली जातात आणि निवडणुका पार पडल्या की, त्या आश्वासनांचा विसर नेत्यांना पडतो. परंतु नेत्यांची खोड मोडायची असेल तर निवडणुकांसारखा दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे अनेकदा नेत्यांवर नाराज असलेले लोक मतदानावर बहिष्कार (Boycott Voting) टाकण्याचा निर्णय घेतात.

सध्या असाच निर्णय महाराष्ट्रातील एक दोन नव्हे तर तब्बल आठ गावांतील नागरिकांनी घेतला आहे. या 8 गावच्या गावकऱ्यांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेचा प्रश्न मागील 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत राज्य शासनाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिकादेखील सादर करण्यात आली आहे. परंतु, या याचिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काहीच निर्णय होत नसल्याने नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाशी संबंधित आमगावातील तहसील कार्यालयामध्ये सभादेखील घेण्यात आली होती. (Amgaon Municipal Councils in Gondia District)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमगाव (Amgaon) नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित असल्याने, नागरिकांची कामे मार्गी लागत नाहीत, शिवाय त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे या परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 8 गावांतील नागरिकांनी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालू नये. उलट मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या 8 गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अनेक पक्षांच्या समर्थकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रश्न राज्य शासनाच्या संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा विधानसभेच्या (Assembly) निवडणुकीच्या काळात बहिष्कार टाकू, अशी भूमिका काही लोकांची आहे. त्यामुळे आता याबाबतचा नागरिक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर पोलिसांनी हेतू पुरस्कर नागरिकांना मतदानापासून वंचित केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे फक्त निर्देश दिले आहेत. त्यामुळे या आठही गावातील नागरिक नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT