Sanjay Nirupam, Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

Congress News : 'उत्तर मुंबईबाबत तडजोड नाही अन् एकट्या ठाकरे गटाला 23 जागा दिल्यावर बाकीच्यांचं काय?'

Atul Mehere

Maharashtra Politics Latest News : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागांचा हट्ट धरू नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दिली आहे. दिघोरी परिसरातील भारत जोडो मैदानावर आयोजित काँग्रेसच्या महारॅलीच्या निमित्ताने नागपूर येथे आले असता निरुपम यांनी लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य केले.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत काँग्रेसकडून कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असेही निरुपम यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच जागावाटपाचे धोरण राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. एकट्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली तर आघाडीतील उर्वरित सर्व पक्षाचे काय होणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आघाडीचा धर्म निभावताना सर्व पक्षांना समान न्याय मिळावा, अशी काँग्रेसची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस आपल्यासोबत असलेल्या कोणत्याही पक्षावर अन्याय होऊ देत नाही, होऊ देणार नाही. परंतु एकाच पक्षाने जागांबाबत अडवणुकीचे धोरण स्वीकारणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. उत्तर मुंबई लोकसभेच्या जागेबाबत आपण ठाम आहोत. त्याबाबत कोणतीही चर्चा, तडजोड कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे. ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने बऱ्याच जागा जिंकल्या होत्या. पण त्यातील अनेक उमेदवार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटीनंतर विखुरले आहेत. त्यामुळे पक्षीय बळाच्या आधारावर जागा वाटप होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'बैठकीत ठरेल फॉर्म्युला'

लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नाही. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने जागांबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर बोलणे संयुक्तीक होणार नाही. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर तो जगजाहीर होईलच, असे काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आघाडीतील जागावाटपाची घोषणा सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतरच करणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्ष किंवा नेत्याच्या नाराजीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यानंतरही जागावाटपाबाबत काही तिढा असल्यास तो संबंधित पक्षांच्या नेत्यांशी चर्चेतून सोडविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी भाजपला रोखण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT