Nana Patole News Sarkarnama
विदर्भ

Loksabha Election 2024: पहिलं आमंत्रण धुडकावले, आता पुन्हा वंचितला आघाडीचे पत्र

जयेश विनायकराव गावंडे

Congress News : आगामी लोकसभा निवडणुकीत वंचितला महाविकास आघाडीत घेण्यावरून चर्चा सुरू असताना. महाविकास आघाडीतील जागावाटपावरून आघाडीतील नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला आजच्या बैठकीचे दिलेल्या निमंत्रणावरून प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने 'वंचितला' बैठकीसाठी कसे काय आमंत्रण दिलं गेले, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला होता. यावर महाराष्ट्रात आघाडी संदर्भात बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन काँग्रेसच्या नेत्यांकडे दिलेले असल्याचे म्हटले. दरम्यान, आता पुन्हा महाविकास आघाडीकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे पुन्हा निमंत्रण पत्र प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीएमधील घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीची जागा वाटपावरून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले होते. (Loksabha Election 2024)

या बैठकीला वंचितचे नेते जाणार की नाही यावरून चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण पत्राला प्रत्युत्तर देत, नाना पटोले यांना धारेवर धरले. काँग्रेस हायकमांडकडून तुम्हाला आघाडी करण्याचे किंवा युती करण्याचे महाराष्ट्रात अधिकार दिले आहेत का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना विचारला. तर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी 23 जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होत की, निवडणुकांची घोषणा झाल्यावर वंचितला आघाडीत समाविष्ट होण्यासाठी चर्चा करू. तर दुसरीकडं महाराष्ट्रातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नाना पटोले (Nana Patole) करत असल्याचं प्रत्युत्तर देण्यात आले.

त्यानंतर वंचितच्या नाराजीची चर्चा होऊ लागली. त्यानंतर झालेल्या फोन कॉलमध्ये पुढे जेव्हा महाविकास आघाडीची जी बैठक होईल, त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावे, अशी विनंती चेन्नीथला यांनी केली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची ही विनंती आंबेडकर यांनी मान्य केली आहे.

दरम्यान, बैठकीच्या निमंत्रणावरून दिवसभर महाविकास आघाडीत खलबत सुरू होती. त्यानंतर आता बैठक ठरवण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीला पुन्हा निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

आता पाठवलेल्या निमंत्रणात काय म्हटलंय...

देश आज एका कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करतो आहे. विद्यमान सत्ताधारी पक्षाकडून लोकशाही पायदळी तुडवली जाते आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीनही पक्षांनी या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये संविधानाप्रती आदर आणि निष्ठा असणाऱ्या सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अशी भूमिका एकमताने स्वीकारली असल्याचं निमंत्रणात म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे त्यानुसार या तीन पक्षांचे अध्यक्ष अनुक्रमे मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे (UddhavThackrey) यांनी आम्हाला महाराष्ट्राच्या स्तरावर सर्व समविचारी पक्षांची बैठक आयोजित करून चर्चा करण्यासाठी अधिकृत केले आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने आज २५ जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित बैठकीत सहभागी व्हावे, असे आदरपूर्वक निमंत्रण आम्ही दिले होते.

लोकशाही व संविधानाप्रती आपण निःसंशय कटीबद्ध आहात. विद्यमान सत्ताधारी पक्षाने देशात निर्माण केलेले चित्र बदलण्यासाठी एकजुटीने सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण नक्कीच या लढाईत सामील व्हाल, अशी सकारात्मक अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. आज आपणांसमवेत झालेल्या कॉन्फरन्स कॉलप्रमाणे आपली पुढील बैठक ३० जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथे घेण्याचे निश्चित झाले आहे. त्याप्रमाणे कृपया आपली वेळ राखून ठेवावी, ही विनंती. बैठकीची वेळ आणि मुंबईतील नेमके स्थळ २९ जानेवारी रोजी सायंकाळी आम्ही आपणांस कळवू.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचा विपर्यास झाला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका हीच त्यांची भूमिका आहे व त्यामध्ये कुठेही त्यांनी वंचित बहुजन आघाडीसमवेत एकत्रित निवडणूक लढविण्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केलेले नाही. रमेश चेन्निथला यांनी देखील आजच आपल्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. यातून आपला गैरसमज दूर झाला असावा, असा आम्हाला विश्वास आहे.

(Edited by Sachin waghmare)

SCROLL FOR NEXT