Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacch kadu : अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील, बच्चू कडूंचा दावा !

Maharashtra : २० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.

सरकारनामा ब्यूरो

MLA Bacchu Kadu News : ठाकरे गट वगळता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटात सहभागी झालेले आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, २० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार मजबुतीने राहील आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की.

येत्या १० ते १५ दिवसांत आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अगोदर ही घडामोड होणार आहे. ठाकरे गटातील आमदार फुटण्याचा प्रश्‍नच राहिलेला नाही. कारण तेथून जे निघायचे होते, ते आधीच निघालेले आहेत, असेही ते म्हणाले. शिवसेनेतील ४० आमदार फुटल्यानंतर ही मोठी घडामोड राज्यात होणार आहे. बच्चू कडू यांनी हा दावा केल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांकडे संशयाच्या नजरेने बघितले जात आहे.

बच्चू कडू प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे. सतत चार वेळा ते अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मागील सरकारमध्ये राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

महाविकास आघाडीतील १० ते १२ आमदार फुटणार असल्याचा दावा करताना त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. हे आव्हान देणे आता पोचट झाले आहे. अशा आव्हान देण्याला काही अर्थ नाही. आदित्य ठाकरेंचा हा बालिशपणा आहे. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल, तेव्हा आव्हान दिले पाहिजे. आता केवळ बडबड करण्यात काही अर्थ नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) आव्हान देण्याची येवढीच हौस असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मतदारसंघात जाऊन लढावे. तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला दाखवून देईल, अशा गोष्टींना काहीही अर्थ नाही. हा केवळ पोरकटपणा आहे आणि वेळ काढून नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असेही बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले. सरकार पडेल, अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. पण या बातम्यांमध्येही दम नाही. कारण सरकार पडण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT