Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aghadi News : '2014'च्या निवडणुकीत काय झालं होतं? पवारांच्या 'NCP'चा काँग्रेसला इशारा

Rajesh Charpe

Nagpur News, 08 Oct : नागपूर शहरातील सर्व सहा जागांवर काँग्रेसने दावा केला असल्याने राष्ट्रवादी (शरद पवार ) आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन अशा चार जागांची मागणी केली आहे.

स्वबळावर लढण्याचा प्रयोग 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी केला होता. त्यावेळी काँग्रेसची शहरात काय परिस्थिती झाली होती, याकडे लक्ष वेधून राष्ट्रवादीने काँग्रेसला इशारा दिला आहे.

2014च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तुटली होती. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. नागपूर शहरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपापले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी नागपूर (Nagpur) शहरातील एकाही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला नव्हता.

नागपूर ग्रामीणमधील माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांचा अपवाद वगळता सर्व पाच मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. स्वबळावर लढण्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमजोर लेखण्याची जबर किंमत काँग्रेसला त्यावेळी चुकवावी लागली होती.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार विकास ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेसुद्धा मदत केली. त्यामुळेच पाच लाख मतांचा आकडा त्यांना गाठता आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे हेविवेट नेते रिंगणात असतानाही जबरदस्त लढत नागपूरमध्ये झाली होती. याचे श्रेय निश्चितच काँग्रेसचे असले तरी काही वाटा मित्रपक्षांचाही आहे. तो नाकारून चालणार नाही असेही राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पूर्व नागपूरसह शहरातील दोन जागांची मागणी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे केली. सोमवारी पक्षाच्यावतीने मुंबईत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर पेठे यांनी दावा केला.

ते म्हणाले, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे. आमचे शहरात अस्तित्व नाही, ताकद नाही असे कोणाचे म्हणणे असेल तर ते अयोग्य आहे. 2014ची विधानसभेची निवडणूक काँग्रेसने स्वतंत्र लढली होती. महापालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसने आम्हाला सोबत घेतले नव्हते. आमचा एकच नगरसेवक निवडून आला. मात्र, दीडशे जागांवर लढणाऱ्या काँग्रेसचे फक्त 29 उमेदवार निवडून आले हेसुद्धा काँग्रेसने विसरू नये.

अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते पडली आहे. एकत्रित लढलो असतो तर दोन्ही काँग्रेसला फायदा झाला असता. काँग्रेसमधील मतविभाजनामुळे भाजपचे 108 नगरसेवक निवडून येऊ शकले याकडेही पेठे यांनी लक्ष वेधले.

मध्य नागपूर, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन्ही आमदार अवघ्या साडेचार हजार मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे विधानसभेतील मताधिक्य दहा हजाराच्यावर नाही असे सांगून पेठेंनी यामुळे कुणाचे नुकसान जास्त होईल याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT