Uddhav Thackeray News  Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray News : ठाकरेंच्या निशाण्यावर एकाचवेळी मंत्री राठोड, खासदार गवळी आणि सोमय्या ! नेमकं काय म्हणाले ?

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी पोहरादेवी येथे भेट दिली. त्यानंतर शिंदे गटात गेलेल्या मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघ असलेल्या दिग्रस येथे मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यासह किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दिग्रस येथील मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी- शाह, शिंदे फडणवीस यांच्यासह शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी, संजय राठोड आणि किरीट सोमय्या यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, येथील आमदार व खासदार अशा दोघांवरही आरोप होते. आपल्या खासदार ताई तर पळाल्या होत्या. हो पळाल्याच होत्या. पण मागच्या वर्षी वर्तमानपत्रात पंतप्रधानांना राखी बांधतानाचा त्यांचा एक फोटो आला. आणि त्यांच्या चौकशीचं पुढं काय झालं कुणास ठाऊक असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.

भारतीय जनता पक्ष (BJP) हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणूवून घेतो. पण त्याच पक्षातील एका दलालानंच जी खासदार भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे असा आरोप केला होता. त्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या त्या खासदार ताईंकडून राखी बांधून घेतली आहे. मी असं ठरवलं आहे की, ज्या ज्या शिवसैनिकांवर ईडी, इम्कम टॅक्स, सीबीआय यांच्या चौकशीचं शुक्लकाष्ठ असेल. त्यांना खासदार ताई आणि जो आरोप करतोय ना त्या दलालाच्या घरी जा असं सांगणार आहे.

आणि त्यांना आम्हांला तो मार्ग तरी दाखव की, ज्यांच्यावर तू भ्रष्टाचाराचे आरोप केलेत,त्यांच्यावर तू असं काय शिंपडलंस की, ते स्वच्छ झाले आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले अशा खास शैलीत उध्दव ठाकरेंनी भावना गवळी यांच्यासोबतच भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खरपूस समाचार घेतला.

निवडणूक आयोगावर निशाणा...

या सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, आता ही समोरची ही गर्दी पाहून तरी आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. नसतील उघडले तर त्याने ते मिटलेलेच ठेवावेत. कारण या ठिकाणी असलेल्या मतदारांचे डोळे उघडले आहेत. समोर बसलेले लोकं हे जगदंबेचे रूप आहे. शंकराचे तिसरे नेत्र आहे असंही ते म्हणाले.

राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार

जगदंबेला आशीर्वाद मागितला पाहिजे. मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असा आशीर्वाद मागितला नाही. या राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार चाललं आहे. राजकारण खालच्या पातळीवर जात आहे. महाराष्ट्र हा राकट, कणखर होऊ दे, असे मागणे मागितले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजपचा आता बाजार बुणग्यांचा पक्ष..

दोनशे रुपये हफ्ता घेणाऱ्याला तुम्ही मंत्री का केला. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हतं असा टोलाही ठाकरेंनी यावेळी संजय राठोड यांना लगावला. आपला अजून भाजप पक्ष झाला नाही. भाजपचा आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर होते यांनी मेहनत करुन भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे.

भाजपला ठाकरे नको, शिवसेना(Shivsena) हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा प्रश्ना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT