Uday Samant Sarkarnama
विदर्भ

Ladaki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजना' उद्योग विभागात कशी आली? उदय सामंतांनी दिलं स्पष्टीकरण

Rajesh Charpe

Nagpur News, 27 Sep : महाराष्ट्रातील उद्योग गुजरात व इतर राज्यांमध्ये पळवले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत केला जातो. लोकसभेच्या निवडणुकीत सेमीकंडक्टर प्रकल्पावरून बरेच राजकारण तापले होते.

लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी याचे चांगलेच भांडवल केले होते. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांमार्फत फेक नरेटिव्ह केलं जाऊ नये, याकरिता उद्योग विभागांमार्फत दक्षता घेतली जात आहे.

याकरिता राज्यात विभाग निहाय महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम घेतला जात आहे. या माध्यमातून पुराव्यानिशी राज्यात किती परकीय गुंतवणूक आली, किती उद्योग सुरू झाले, किती रोजगारांची निर्मिती झाली याची माहिती दिली जात आहे. त्याचे सादरीकरण केले जात आहे. महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Bahin Yojana) समावेश करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यावरून विरोधकांकडून टीकाही केली जात आहे. मात्र, ही योजना उद्योग विभागात कशी आली? याचे खरे कारण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. नागपूर विभागाच्या उद्योग भरारी कार्यक्रमानंतर बोलताना सामंत म्हणाले, महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे वर्षाला 46 हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. हा सर्व पैसा बाजारात येणार आहे. त्यातून नवे छोटे मोठे व्यवसाय सुरू होतील, रोजगार निर्मिती होईल.

बाजारातील खरेदी-विक्री वाढेल. उद्योग विभागात व्यापाराचाही समावेश होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा समावेश उद्योग भरारी कार्यक्रमात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज नागपूर (Nagpur) विभागात उद्योग भरारीचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्योग आणि गुंतवणूक आणली त्याची माहिती उद्योजक, व्यावसायिक, युवकांना पुराव्यानिशी देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गडचिरोली जिल्ह्याची आम्ही ओळख बदलवली

शिवाय आता या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत राजकारण करता येणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची आम्ही ओळख बदलवली. येथे सुमारे 60 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. स्टील उद्योजकांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीला नवी ओळख देण्यात आली आहे.

नागपूरच्या एमआयडीसीमध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रामटेक आणि कामठी तालुक्यात तीन हजार हेक्टर जागा घेणार आहोत. राज्यातील पहिली महिला एमआयडीसी कामठी तालुक्यात स्थापन केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पूर्व विदर्भात स्टार्टअपच्या माध्यमातून 35 हजार नवे उद्योजक तयार झाले असल्याचंही सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT