Nana Patole, Narendra Modi and Amit Shaha Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : मोदी सरकारने दोन्ही आदिवासी समाजांत भांडणे लावून मणिपूर जाळले, पटोलेंचा घणाघात !

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole on Modi Government : आजघडीला महाराष्ट्रात काय अन् संपूर्ण देशात कुणीही आनंदी नाही. कारण गेल्या ८० दिवसांपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशांत फिरत राहिले. गृहमंत्री अमित शाह निवडणूक आहे, म्हणून छत्तीसगडमध्ये गेले. पण मणिपूर शांत करण्यासाठी एकही गेला नाही, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. (Nana Patole attacked the central government)

आज (ता. २२) नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, हे सरकार हवेत आहे. जमिनीवर यायला तयार नाही. कुणाला फोडायचे अन् त्यासाठी दिल्ली वाऱ्या करायच्या यातच, ते व्यस्त आहेत अन् जनता वाऱ्यावर सोडली आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला.

बजेटमध्ये पंचामृत असं वर्णन केलं, शेतकऱ्यांना भरीव मदत करू असं सांगितलं, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कर्ज माफ झाले नाही. शेतकरी विरोधी धोरण या सरकारचे आहे. नकली बियाणे महाबीज कडून येते आहे, हे दुर्दैवी आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. पण घरगुती भांडणातून आत्महत्या होत असल्याचं सांगून आत्महत्यांचा आकडा कमी केला जात असल्याचा घणाघाती आरोप पटोलेंनी केला.

खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार भरती सुरू आहे. तरुणांची घोर फसवणूक सरकार करत आहे. माधव गाडगीळ समितीची शिफारस ‘पेंडिंग’ आहे. त्याकडे लक्ष दिले असते तर इर्शाळवाडीसारखी घटना घडली नसती. आम्ही दोन्ही सभागृहांत मुद्दे उचलत आहोत, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत विचारले असता, ज्या पक्षाची जास्त संख्या जास्त, त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता होईल. पण निर्णय अध्यक्ष घेतील. यासंदर्भात दोन्ही सहकारी पक्षाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घ्यावा, असं आमच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे, असे ते म्हणाले.

भविष्यात मोठे पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर नाना म्हणाले, भाजपवाले पुडी सोडणारे आहे, काँग्रेसचे लोक आमच्याकडे येतील, अशी पुडी ते सोडतात. खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या. अन् त्या दुकानांवर मोदींचा हसरा फोटो लावला, तो शेतकऱ्यांना चिडवतो आहे. तेलंगणा सरकारने धरण बांधल्याने गडचिरोली आणि पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. यावर सरकारने त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे.

मणिपूरमुळे देशाला कलंक लावण्याचे काम मोदी सरकारने (Modi Government) केले. भाजपला (BJP) सत्तेची मस्ती आली आहे. ८० दिवसांपासून मणिपूर जळते आहे आणि पंतप्रधान ८०व्या दिवशी बोलले. ते विदेशात फिरत राहिले, पण मणिपूरमध्ये गेले नाहीत. राहुल गांधी त्याठिकाणी जाऊन आले, असे सांगताना महाराष्ट्रात तीन पक्षाच्या सरकारमुळं अस्वस्थता वाढली आहे, ‘तीन तिगाडा’ सरकार आहे, यावर आम्ही अधिक बोलणार नाही, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT