Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur After Civil20 India: सी-२० नंतर कोमजली हिरवळ; दिव्यांची आरास काढली, पण खिळे कायम?

सरकारनामा ब्यूरो

C-20 Nagpur City News : फुटपाथवर दुकान थाटलेल्या एखाद्या गरीब माणसाने झाडाला एखादा खिळा ठोकला तर महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करते. पण आंतरराष्ट्रीय सी-२० परिषदेसाठी शहरभर विजेच्या दिव्यांची आरास लावण्यात आली. त्यासाठी ठिकठिकाणी अगदी झाडांवर खिळे ठोकले. आरास तर काढली, पण खिळे काढण्याचे भान महापालकेला राहिले नाही.

आंतरराष्ट्रीय परिषदेनंतर तीनच दिवसांत शहरभर केलेली हिरवळ आणि फुले कोमेजली. त्यामुळे ९० टक्के सजावट परिषद संपल्यानंतरही कायम राहणार या महापालिका आयुक्तांच्या वक्तव्याला हरताळ फासला गेला. शहराच्या सौंदर्यीकरणात खिळे ठोकून झाडांना जखमी करणाऱ्या महापालिकेनेच आता हात वर केल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील झाडांवर खिळे रुतलेलेच आहेत.

या झाडांच्या जखमांवर फुंकर कोण मारणार, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेची बेपर्वा वृत्ती जुन्या मोठ्या झाडांचा बळी घेणार की काय, यासाठी संताप व्यक्त केला जात आहे. जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत नागपुरात २० व २१ मार्चला सी-२० ची बैठक झाली. यात विदेशातील प्रतिनिधी व देशातील तज्ज्ञांनी भाग घेतला. या परिषदेसाठी महापालिकेने महिनाभरापासून शहर सौंदर्यीकरणाचे काम केले.

ही परिषद संपल्यानंतर तीन दिवसांमध्येच हिरवळ व फुलांची झाडे कोमेजली. याच परिषदेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यासाठी भाड्याने घेऊन विद्युत दिव्यांची झाडांवर आरास करण्यात आली. यासाठी महापालिकेनेच झाडांवर खिळे ठोकण्याची अलिखित परवानगी दिली, हे आता स्पष्ट झाले. परिषद संपुष्टात आल्यानंतर झाडांवरील विद्युतदिव्यांची आरास काढण्यात आली. परंतु झाडांवर ठोकलेले तीन लाख खिळे अजूनही कायम आहेत.

‘गरज सरो अन् वैद्य मरो’, या म्हणीप्रमाणे महापालिका (Municipal Corporation) झाडांसोबत क्रूरतेने वागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्युतदिव्यांची किंमत असल्याने ते काढण्यात आले, परंतु खिळ्यांची आता किंमत राहिली नसल्याने नागपूर (Nagpur) महापालिकने झाडांवरील घाव तसेच ठेवल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी यांनी व्यक्त केली.

पक्षांच्या नैसर्गिक विहारातही अडथळे..

झाडांना खिळे व आकर्षक रोषणाई पक्षांच्याही मुळावर आली. आकर्षक रोषणाईसाठी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या विद्युत दिव्यांचा रात्रीला होणाऱ्या प्रकाशामुळे पक्षांच्या नैसर्गिक विहारातही अडथळे निर्माण झाले. काही झाडांवर पक्षांचे घरटे होते. रात्री घरट्यात येताना लख्ख प्रकाशामुळे पक्षांना दिवस की रात्र याचा अंदाज घेणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेक पक्षांना घरटे सोडून विद्युतदिवे नसलेल्या इतर झाडांवर निवारा शोधावा लागला. यात त्यांच्या नैसर्गिक क्रियेत अडथळा निर्माण झाला.

झाडांमध्ये झायलम आणि फ्लोएम असते. यातून झाडांना अन्न, पाणी व न्युट्रीन मिळत असते. आता खिळ्यांमुळे झाडांना हे सर्व मिळण्यात अडथळे निर्माण होतील. त्यामुळे झाडांची वाढ तर खुंटणारच, शिवाय त्यांचे आयुष्यही कमी होईल. याशिवाय खिळे ठोकलेल्या जागेतून झाडांवर बुरशीजन्य संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडांतून खिळे काढणे गरजेचे आहे, असेही कौस्तव चॅटर्जी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT