Fadnavis Vs Thackeray Sarakarnama
विदर्भ

Assembly Winter Session : '' ते अधिवेशनात आले, प्रत्यक्ष येऊन बसले, हे काय....'' ; फडणवीसांची ठाकरेंना कोपरखळी

Mayur Ratnaparkhe

Nagpur Winter Session 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने जम्मू काश्मिरमध्ये कलम 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना मोदी-शाहांवर उपरोधित टोला लगावतानाच निवडणुकीआधी पाक व्याप्त काश्मीरही भारतात आणावा असं म्हटलं होतं. याच टीकेवरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, '' किती आनंदाची गोष्ट आहे, उद्धव ठाकरे आले. अधिवेशनात आले. आता ते किती दिवस आले याचा हिशोब तुम्ही लावा. पण आले हे काय कमी आहे? प्रत्यक्ष येऊन बसले हे काय कमी आहे? त्यामुळे मी आता त्यावर फार बोलणार नाही. जो न्याय नवाब मलिकांना आहे, नवाब मलिकांसारखा(Nawab Malik) आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्यावर तोच न्याय लागला पाहिजे. हे आम्ही सांगू.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असंही म्हणाले, धारावीचा विकास झाला पाहिजे, मोदींच्या मित्राचा विकास नाही झाला पाहिजे, असं सांगत फडणवीसांनी प्रतिक्रिया विचारली, तेव्हा फडणीस म्हणाले, ''पहिलं जे धारावीचं कंत्राट होतं ते तर अदाणींना नव्हतं. ते कंत्राट रद्द करण्याचं काम कोणाच्या सरकारने केलं? उद्धव ठाकरेंच्या सरकारनेच केलं. आता जे कंत्राट झालेलं आहे, त्याच्या सर्व नियम व अटी ठरवण्याचं काम कोणी केलं? तेही उद्धव ठाकरेच्या सरकारने केलं.''

''ही उद्धव ठाकरेंची नीती आहे. ते विकास कामांना नेहमीच विरोध करतात आणि धारावीच्या लोकांना घर मिळू नये. कारण यांना घर मिळालं तर हे कदाचित आमच्या पाठीमागे येणार नाहीत. यांना झुंजवत ठेवा, अशाप्रकारची नीती त्यांची दिसते आहे. त्याअंतर्गतच त्यांचं काम सुरू आहे.'' असं फडणवीसांनी सांगितलं.

याशिवाय ''अगोदर त्यांनी रिफायनरीला विरोध केला, मग त्यांनीच त्यांच्या सरकारमध्ये पत्र पाठवलं की रिफायनरी इकडे नाही तर इकडे करा. तिकडे रिफायनरी करायला घेतली तर स्वत:च तिथे विरोध करायला गेले. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव हा विकासाला विरोधाचा आहे. ज्याचा विकासाला विरोध आहे त्या व्यक्तीशी काय बोलायचं?'' असंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं.

तर कादां निर्यातीच्या मुद्य्यावर बोलताना फडणवीसांनी सांगितले की, ''केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची मी भेट घेतली आहे. मी त्यांना विनंती केली की आपण निर्यात सुरू केली पाहिजे. त्यावेळी त्यांनी ही बाब मला सांगितली, की देशात कांद्याचं जे उत्पादन आहे. देशाला जेवढी गरज आहे त्याच्या 25-30 टक्के कमी साठा आहे.

अशावेळी जर आपण निर्यातीस परवानगी दिली, तर मोठ्याप्रमाणात देशात टंचाई निर्माण होईल. परिणामी सामान्य ग्राहकास कांद्याचे भाव परवडणार नाहीत. म्हणून आम्ही निर्यातीस बंदी केली आहे.'' अशी माहिती फडणीसांनी यावेळी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT