Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : मोदी सरकारच्या विरोधात प्रत्येकाच्या मनात चीड, आता सत्ता उलथवणार !

Narendra Modi News: दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारने या देशाची माती केली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Congress News: यात्रेमुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून ते दिसून आले. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसने आता संकल्प यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेसच्यावतीने तीन सप्टेंबरपासून राज्यात संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्याविरोधात प्रत्येकाच्या मनात चीड असून संकल्प यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिकाच्या भावना जाणून घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यात्रेच्या तयारीसाठी काल (ता. २२) नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

बैठकीला माजी मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री आमदार नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, रणजीत कांबळे, माजी आमदार अशोक धवड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पटोले म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारने या देशाची माती केली. संवैधानिक व्यवस्थेला संपवले. या देशाला बेरोजगारांचा देश बनवला. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला परावृत्त केले. महागाई वाढवली. मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. थोर नेत्यांचा अपमान केला जात आहे. या सगळ्या गोष्टींबाबत जनतेमध्ये चीड आहे. त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे.

काँग्रेस पक्ष हा देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला न्याय देणारा आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या सरकारच्या योजना कशा बोगस आहेत आणि सरकारने जनतेला लुटून उद्योजकांना कसे मोठे केले, याची माहिती यात्रेच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना विदेशात जाण्याची बंदी होती. पंतप्रधान झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी मै व्यापारी हू, असे सांगितले होते. आता व्यापारी कसा जनतेला लुटतो याचा प्रत्यय जनतेला येत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.

भ्रष्ट कोण, हे कॅगचा रिपोर्ट सांगतो..

अठरा कोटींचा रस्ता अडीचशे कोटींमध्ये कसा केला जातो, हे कॅगच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या रिपोर्टवरून मोदी सरकार किती भ्रष्ट आहे दिसून येते. कृत्रिम महागाई वाढवून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. या सगळ्या गोष्टींची पोलखोल आम्ही करणार आहोत, असेही पटोले म्हणाले.

महाराष्ट्रात येड्यांचे सरकार..

महाराष्ट्रात (Maharashtra) येड्यांचे सरकार आहे. कोणी काहीही बोलतो, निर्णय घेतो. आपसातच श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. तोडफोड करून भाजपने (BJP) सरकार स्थापन केले आहे. त्याचाही राग सर्वांच्याच मनात आहे. हा राग जनतेपर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावू, असा दावा नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT