Sudhir Mungantiwar and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole On Mungantiwar : मुनगंटीवारांची ‘पप्पू’ची टीका नाना पटोलेंना झोंबली, म्हणाले...

Atul Mehere

Nagpur Political News : भाजपच्या एका मंत्र्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या संदर्भात व्यक्त केलेली प्रतिक्रिया पटोलेंना अशी काही बोचली की, त्यांनी आगळ्यावेगळ्या शब्दांमध्ये या मंत्र्यांचे स्वागत केले. (Congress is Pappu's party. Nana Patole is also a pappu)

काँग्रेस हा पप्पूंचा पक्ष आहे. नाना पटोले हेदेखील एक पप्पूच आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (ता. १३) सकाळी नागपूर विमानतळावर बोलताना व्यक्त केली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार मायदेशी परतले.

उपराजधानी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुनगंटीवार यांचे भाजपकडून जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना मुनगंटीवारांनी पटोलेंवर टीका केली. मुनगंटीवार यांच्या या टीकेला नाना पटोले यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या नावावर हे मंत्री आले परदेशात भटकून. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून देशात परतले अन् भाजपचे अंधभक्त त्यांचे स्वागत करत आहेत, अशी परखड टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. राज्यातील हे मंत्री महोदय नेहमीच बेजबाबदार वक्तव्य करत असतात. त्यांच्या कोणत्या टीकेला उत्तर देणे योग्य नाही, असे पटोले यांनी या वेळी म्हणाले.

जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा अशा मंत्र्यांनी व महाराष्ट्र सरकारने लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला पटोलेंनी दिला. काँग्रेस पक्ष जनमानसाच्या मनात आहे. संविधानाचे रक्षण ही काँग्रेसची पहिली जबाबदारी आहे. आगामी निवडणुकीमध्ये ही बाब स्पष्ट होईलच, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कायम आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या सर्वाधिक असेल. त्यामुळे मुख्यमंत्रीदेखील काँग्रेसचाच होईल, असे ठाम प्रतिपादन नाना पटोले यांनी केले. या संदर्भात पक्षश्रेष्ठी स्तरावर बोलणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

'चाचांनी' म्हटल्यावर 'भतीजाची' काय टाप

अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊच शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ठामपणे सांगितले आहे. चाचांनी' म्हटल्यावर 'भतीजाची' काय टाप आहे की ते मुख्यमंत्री बनतील, असा टोलाही आमदार नाना पटोले यांनी लगावला.

जातीनिहाय गणना हवी

राहुल गांधी यांनी ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यावरून प्रत्येक समाजाला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मजबूत करण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी केला आहे. मध्य प्रदेशात बहुमताचा अपमान करण्यात आला होता. त्याचा राग लोकांच्या मनात आहे. पाचही राज्यांत भाजपचे पानिपत होईल. या सरकारने प्रत्येक स्तरावर लोकांना त्रास दिला आहे.

पाचही राज्यांत हीच परिस्थिती आहे. राजस्थानमध्ये आरोग्यविषयक कायदा तयार करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांसाठी काम झालं आहे. दिलेलं वचन पूर्ण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसलाच विजय मिळेल, असे भाकीत आमदार पटोले यांनी व्यक्त केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT