Nana Patole On Eknath Shinde. Google
विदर्भ

Bhandara : गंमत-जंमत बंद करून जरा गांभीर्यानं महाराष्ट्रातील सरकार चालवा

अभिजीत घोरमारे

Congress on Shiv Sena : राज्यातील मूळ प्रश्न वेगळे आहेत. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी वेळ नाही. त्यांचं भलतच काहीतरी सुरू असतं. त्यामुळं ही गंमत-जंमत बंद करू जरा गांभीर्यानं सरकार चालवा, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी लगावलाय.

रविवारी (ता. 17) आमदार पटोले यांनी भंडारा येथे आगमन झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यातील प्रश्नांसाठी शिंदे यांच्याकडं लक्ष द्यायला वेळच नाही, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान विरोधकांना लक्ष्य केलं. त्यावरून पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. गेल्या 25 वर्षात रस्ते कुणी धुतले नाही, तर वेगळीच धुलाई सुरू होती. यावर्षी मुंबईतील नालेसफाई चांगली झाली, त्यामुळे कुणाला गाणं बनविण्याची वेळ आली नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची तर थोपटा. आम्ही विधान सभेत पहिल्या दिवसापासून दररोज शेतकरी, बेरोजगारी व महागाईवर बोलतोय. मुख्यमंत्री यावर बोलायलाही तयार नाहीत, असं पटोले यांनी नमूद केलं.

विधिमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांना यावर चर्चाच करायची नसेल तर काय म्हणावं, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविण्यासाठीच धोकेबाजांचे खोक्यांचे सरकार आणले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमध्ये उद्घाटन केलेलं डायमंड हब महाराष्ट्राच्या हक्काचं होतं. सरकारने महाराष्ट्रातील कामं गुजरातला देण्याचा सपाटा बुलेट ट्रेनपासून सुरू केलाय, असं पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबाईची मालमत्ता सध्या अदानीला विकण्यात येत आहे. अख्खी मुंबईच हे सरकार अदानीच्या नावावर करीत आहे. अदानीला प्रत्येक करातून सूट आहे. त्यांना जीएसटीही माफ आहे. आयकरात सूट आहे. ही सर्व किमया करण्यासाठीच शिंदे-फडणवीस यांचं सरकार आणलं गेलय. त्यामुळं डायमंड उद्योग बाहेर गेल्यास नवल वाटत नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

महाराष्ट्राला बरबाद करण्याचा मोदी आणि शाह यांचा मोठा डाव आहे. डायमंड उद्योग ही केवळ सुरुवात आहे. आधीपासूनच मुंबईवर आणि महाराष्ट्रावर गुजरातचा डोळा आहे. त्यामुळं संधी मिळेल त्यावेळी ते आपल्या ताटातून घास पळवत असतात, असा घणाघातही पटोले यांनी केला. राज्य आणि केंद्रातील या सरकारचे हे नखरे आता फार दिवस चालणारे नाहीत. मतदार आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील, असा दावाही आमदार नाना पटोले यांनी यावेळी केला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT