Bhandara Political News: मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरून झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल (ता. १७) केला होता. पटोलेंच्या आरोपाला आता आमदार भोंडेकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. (Nana Patole is mocking the hunger strike of the Marathas)
भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यात कडवटपणा निर्माण झाला आहे. नाना पटोले हे बालिशपणा करून संभ्रम पसरवत आहेत. नाना पटोले हे खोटं बोलत असून, मराठ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी करण्यात आलेल्या उपोषणाची ते थट्टा करत आहेत, असे खडे बोल आमदार भोंडेकरांनी सुनावले आहे.
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमात झालेल्या गोविंदा अपघाताबाबत नाना पटोले (Nana Patole) यांनी भोंडेकरांना हिणवले होते. त्यामुळे भोंडेकर यांनीसुद्धा नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील टीकात्मक विधानानंतर नाना पटोले पटोलेंचा समाचार घेतला. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्य सरकारचं टेन्शन वाढलं होतं. राज्य सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. परंतु या उपोषणावरून विरोधक सरकारवर टीका करण्याची संधी मात्र सोडत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उपोषणाला बसवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात जाणूनबुजून लाठीचार्ज करण्यात आला, तर हे सरकार दोन समाजात भांडणं लावत असल्याचा आरोपदेखील नाना पटोलेंनी केला. जालन्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. एक सप्टेंबरला दुपारी तीन वाजता गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या दिवशी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होती.
या बैठकीवरून लक्ष वळवण्यासाठी लाठीचार्जची घटना घडवण्यात आली, असा आरोप पटोले यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेलं होतं, हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफी मागितली. हे सरकार दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला. नाना पटोलेंनी थेट उपोषणकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केल्याने यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
अशात तापलेल्या वातावरणात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ही उडी घेतली आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. नाना खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. मराठ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी करण्यात आलेल्या उपोषणाची थट्टा ते करत आहेत, असेही भोंडेकर म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील दोन आमदार नाना पटोले आणी नरेंद्र भोंडेकर यांच्यात कडवटपणा वाढल्याचे दिसत आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.