Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत नितीन गडकरी; तोडफोडीवर ‘नो कॉमेंट्‍स’ !

सरकारनामा ब्यूरो

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाच्या धडाक्याने देशभर वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्राचा नेता, मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा, ही महाराष्ट्रातील जनतेची मनोमन इच्छा आहे. हा विषय जेव्हा निघतो, तेव्हा नितीन गडकरींचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. काही नेत्यांनी यापूर्वी तसा उल्लेखही केल्याचे आढळते. पण या विषयावर नितीन गडकरींचे मत मात्र भिन्न आहे.

आज (ता. 22) नितीन गडकरींनी नागपूर ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांच्या प्रश्‍नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिले. या वेळी गडकरी म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, ही भावना चांगली आहे. महाराष्ट्रातील जनतेला तसे वाटणे, हेदेखील स्वाभाविक आहे. मात्र, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. या पदासाठी जात, धर्म, पंथ तसेच प्रदेश पाहून कोणी निर्णय घेत नाही. देशात भाजपची सत्ता येणार आहे आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील.

सध्या भाजपच्या वतीने विविध पक्ष फोडले जात आहेत, अनेकांना भाजपत तसेच महायुतीमध्ये सामावून घेतले जात आहे, यावर आपले म्हणणे काय अशी विचारणा केली असता, गडकरी म्हणाले, ती माझ्या पक्षाची अंतर्गत बाब आहे आणि मी पक्षशिस्त पाळणारा आहे. त्यामुळे या विषयावर बोलणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात विचारले असता, केजरीवाल यांच्या अटकेशी सरकारचा संबंध नाही. तपास यंत्रणा पुरावे व कायद्यानुसार काम करते. त्यामुळे या कारवाईचा संबंध सरकारशी जोडणे चुकीचे आहे. उड्डाणपुलांची निर्मिती ही वाहनधारकांसाठी आहे. गरीब लोकांना त्याचा उपयोग नाही, असा आरोप केला जातो. यावर हा आरोप हास्यास्पद आहे. कारण जेव्हा असे पूल बनतात, तेव्हा त्याखालून लहान वाहने, सायकलस्वार आणि पायी चालणाऱ्यांसाठी रस्ता मोकळा होतो. त्यामुळेच विकास हा सर्व स्तरातील लोकांना डोळ्यांसमोर ठेऊन केला जातो, असे गडकरी म्हणाले.

साखर आणि इथेनॉल निर्मिती यात मध्यबिंदू साधणार असल्याचे सांगत मागास राज्यांच्या विकासासाठी सधन राज्यात टोलआकारणी करून मागास राज्यातील विकासकामांवर तो पैसा खर्च केला जाणार आहे. यापुढे जेवढा रस्त्याचा वापर तेवढाच टोल आकारला जाणार आहे. टोल आकारणीसाठी सॅटेलाइट बेस सीस्टिम आणणार आहे. रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे गडकरींनी सांगितले. येत्या पाच वर्षांत सर्वच प्रवासी बसेस इलेक्ट्रिकवर धावतील. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी ३०० पटीने वाढली असल्याचे सांगत काश्मीर ते कन्याकुमारी थेट हायवेची निर्मिती सुरू असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT