Dr. Babanrao Taywade, OBC Leader Google
विदर्भ

OBC Federation News : ओबीसी पेटून उठला तर आम्हाला दोषी धरू नका; जरांगेंसोबत उभे राहण्याची तयारी !

Atul Mehere

Nagpur OBC Political News : राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या भावनांशी खेळ करू नये. ४०० जातींचा समूह असलेल्या ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा येईल, तेव्हा तो रस्त्यावर येईल आणि यापेक्षा मोठं आंदोलन ओबीसी समाज उभं करेल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी राज्य सरकारला दिला. (Warning of National OBC Federation to Govt)

नागपुरात आज (ता. २३) प्रसार माध्यमांची संवाद साधताना डॉ. तायवाडे यांनी ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाबाबत पुन्हा संताप व्यक्त केला. जरांगे पाटील यांनी उपोषणावर बसण्यापेक्षा ५० टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केल्यास आम्ही मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहू. यामुळे त्यांनाही १२ ते १३ टक्के आरक्षण मराठ्यांना मिळवून देता येईल आणि आमचे आरक्षणही सुरक्षित राहील.

जरांगे पाटील जर ही भूमिका घेत असतील तर आमचं समर्थन त्यांना असेल, असेही डॉ. तायवाडे म्हणाले. राज्य सरकार त्यांना वारंवार सांगत आहे की, ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून आरक्षण दिलं आहे. त्यातून मराठा समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत. आम्हाला जो शब्द दिला होता की, ओबीसीतून आरक्षण देणार नाही, ही भूमिकाच सरकारने कायम ठेवावी. सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं १२ टक्के आरक्षणासंदर्भात सरकारने पुन्हा पिटीशन टाकलेली आहे.

त्यावरून आरक्षणाकरता राज्य सरकार कटिबद्ध आहे, असं दाखवत आहे. आंदोलनासाठी कुठला मार्ग वापरायचा हा जरांगे पाटलांचा प्रश्न. दोन मराठा युवकांनी आत्महत्या केली त्यासाठी संपूर्ण ओबीसी समाजाकडून शोक व्यक्त करतो. अशा पद्धतीने लोकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही ओबीसी समाजाच्यावतीने डॉ. तायवाडे यांनी केले.

जरांगे पाटील यांना आपल्या आंदोलनाची दिशा योग्य वाटत असेल. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के मर्यादेची घातलेली आरक्षणासाठीची अट रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी राज्य सरकारला दोषी धरून काहीही होणार नाही. मनोज जरांगे पाटील जर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला तयार असतील तर देशभरातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला तयार आहे, असा शब्द राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला.

ओबीसी समाज कधीही मराठा समाज किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नव्हताच आणि नाही. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, हीच मुळात ओबीसी समाजाची भावना आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सखोल विचार करून आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी.

मराठा आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाण्याचा अनेक जण प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या आमिषाला बळी न पडता मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजाचा विचार करावा, असं कळकळीचे आवाहन डॉ. तायवाडे यांनी केलं. ओबीसी आणि मराठा समाजाला आपसात लढवण्यासाठी काही राजकीय मंडळी प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही त्यांचे प्रयत्न हाणून पाडू, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही डॉ. तायवाडे यांनी दिला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT