Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
विदर्भ

एक दिवस पुन्हा काँग्रेसचाच येणार : बाळासाहेब थोरातांना विश्वास

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : जाती, धर्मविरहित, समतेवर आधारित काँग्रेस पक्षाचा विचार शाश्वत आहे. त्याची जागा जाती-धर्म भेदाभेद बाळगणारा कोणताही पक्ष घेऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा एक दिवस काँग्रेसचाच येणार आहे, असा दृढ आशावाद काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

पुसद येथील राजीव गांधी काँग्रेस भवन विस्तारित इमारतीचे भूमिपूजन बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते रविवार (ता. 18 रोजी) झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे होते. यावेळी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. सचिन नाईक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. मोहम्मद नदीम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशात 2014 नंतर समाजाला समाजापासून दूर लोटण्याचे काम सुरू आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. सत्तेसाठी विभाजनाचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला आदर्श राज्यघटना दिली. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारावरच काँग्रेस पक्षाने देश पुढे नेला. राज्यघटनेने समतेचा मार्ग स्वीकारला तर संतांनी मानवतेचा विचार दिला. आम्ही सर्व भारतीय आहोत, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. तोच विचार जागविण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा सुरू केलेली आहे. या पदयात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. देश त्यांच्या पाठीशी उभा राहत आहे. परंतु मीडिया हे दाखविण्यास तयार नाही. अशावेळी सोशल मीडियावर भारत जोडो विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. काँग्रेस पक्षाच्या या भारत जोडो पदयात्रेत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुरुवातीला राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ॲड. सचिन नाईक यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्यसेनानी गोदाजीराव मुखरे यांनी 1942 च्या 'चले जाव' आंदोलनात पुसद मधील सुभाष चौकातील मोक्याची जागा काँग्रेस कमिटीला दान केलेली होती. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत या जागेवरील विस्तारित काँग्रेस भवन इमारतीचे बांधकाम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वास्तूसाठी 15 लाख रुपयांचा खर्च येणार असून त्यासाठी डॉ. मिर्झा यांनी दहा लाखापेक्षा अधिक खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले. डॉ. महम्मद नदीम यांनी येत्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष महत्त्वाची भूमिका वठवेल, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून शिवाजीराव मोघे यांनी भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, राम देवसरकर, संजय ठाकरे, प्रकाश देवसरकर, संभाजी नरवाडे, शैलेश कोपरकर, रमेश चव्हाण, जिया खान, गजानन देशमुख, प्रा. संध्या कदम व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT