OBC Students Posting Letters. Sarkarnama
विदर्भ

OBC Demands : एक हजार विद्यार्थ्यांनी विचारले..सीएम साहेब, आठवतेय का तुमची ग्वाही

अभिजीत घोरमारे

Bhandara News : ओबीसींच्या वसतिगृहासाठी भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. विद्यार्थ्यांच्या खेळातील मामांच्या पत्रानंतर आता सीएमच्या पत्राची चर्चा भंडाऱ्यात होऊ लागली आहे. ओबीसी वसतिगृह व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. सरकारने यासाठी ग्वाहीही दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत ओबीसी समाजाच्या मागण्यांची आठवण करून दिली आहे.

‘राज्यात ओबीसी समाजाचा मोठा वर्ग आहे. या प्रवर्गात अनेक जातींचा समावेश आहे. तरीही ओबीसी समाजाच्या मागण्या रेंगाळल्या आहेत. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह 15 ऑगस्टपूर्वी तयार होणार होते. ही ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली होती. आता त्यांना याचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा ही बाब आठवून देण्यासाठी पत्राचा आधार घेत आहोत’, असे पत्रात नमूद आहे.

भंडारा जिल्ह्यात बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर यांची मुले शिक्षण घेत आहेत. बारावीपर्यंत ग्रामीण भागात शाळा, कॉलेजेस आहेत. परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात यावे लागते. शहरात भाड्याने खोल्या घेऊन राहावे लागते. भोजन व घरभाडे लक्षात घेता दोन्ही खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडत नाही. त्यामुळे शहरात ओबीसी वसतिगृह व्हावे, यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्यावतीने मागणी होत आहे.

सिहोरा येथील ओबीसी विद्यार्थ्यांनी यासाठी एक हजार पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहेत. भंडारा येथुन पाठविण्यात आलेल्या पत्रांची संख्याही मोठी आहे. अलीकडेच विधान भवनात ओबीसी संघनाचे प्रतिनिधींची राज्य शासनाने बैठक घेतली. मंत्री अतुल सावे व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. डॉ. फुके यांनी ओबीसी समाजाच्या समस्यांच्या निवारणासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. या बैठकीत त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अनेक विषयांवर शासन निर्णयही (GR) काढण्यात आले आहेत. त्यातील वसतिगृहाचा विषय महत्त्वाचा आहे. त्यावरही शासनस्तरावर काम सुरू आहे. डॉ. फुके हे त्यासाठीही आग्रही आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वसतिगृह होत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशात शासनाने वसतिगृहांसाठी वेळ मागितला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वसतिगृह नसल्याने भूसंपादनापासून इमारत उभारण्यापर्यंतची कामे सरकारला करावी लागणार आहे. मात्र तोपर्यंत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपले काय होणार, असा प्रश्न भेडसावत आहे. त्यातूनच भंडारा जिल्ह्यातील चिंताग्रस्त विद्यार्थ्यांनी हा पत्रप्रपंच केल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT