Narendra Bhondekar and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Patole on Bhondekar : `त्या’ दुर्घटनेसाठी आयोजकांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा; नाना पटोले झाले आक्रमक !

अभिजीत घोरमारे

Bhandara Political News : भंडाऱ्यात रविवारी (ता. १०) झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात एक मोठी दुर्घटना घडली. मात्र, प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही की जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. (Now it seems that this case will heat up)

या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर आणि संबंधितांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा, अशी आक्रमक भूमिका पटोले यांनी घेतली आहे. भंडाऱ्यात आज (ता. १३) जनसंवाद यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेबद्दल चीड व्यक्त केली. त्यामुळे दहीहंडी अपघात प्रकरणात नाना पटोले यांनी उडी घेतल्याने आता हे प्रकरण चांगलेच तापणार असे दिसत आहे.

काँग्रेसच्या वतीने (Congress) सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात आहेत. गांधी चौकात जाहीर सभा संपल्यानंतर नाना पटोलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रविवारी दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, त्याहून जास्त दुर्दैवी आहे ते प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य नसणे.

या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर आणि आयोजकांवर ताबडतोब गुन्हे दाखल व्हायला हवे होते. कारण कायद्यासमोर कुणी लहान कुणी मोठे नसते. पोलिस प्रशासन जर या प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असेल किंवा कोणतीही कारवाई होणार नसेल, तर आम्ही पोलिस प्रशासनाला या प्रकरणात कारवाई करण्यासाठी भाग पाडू, अशी ग्वाही पटोले यांनी या वेळी दिली.

आमदार भोंडेकर यांच्या वतीने रविवारी (ता. १०) विदर्भ (Vidarbha) स्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दसरा मैदानात या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सिने अभिनेत्री नीलम आणि अभिनेता चंकी पांडे यांनीही हजेरी लावली. शेकडो नागरिकांनी भर पावसात दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पाण्याचा मारा सुरू असतानाच थरावर थर करीत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यास सुरुवात केली.

दहीहंडी ४० ते ५० फुटांच्या अंतरावर असल्याने एकाही पथकाला तिथपर्यंत पोहोचता आले नाही. अखेर दहीहंडीचा दोरखंड थोडा खाली घेण्यात आला. त्यानंतर भोजपूर येथील आदिशक्ती गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून पहिला क्रमांक, तर भोजपूरच्याच दुसऱ्या एका पथकाने द्वितीय स्थान पटकावले. दहीहंडी फोडून झाल्यानंतर या दोन्ही विजयी पथकांच्या गोविंदांनी एकत्र येत पुन्हा दहीहंडीच्या दोरखंडापर्यंत पोहोचण्यासाठी थरावर थर लावले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात लोकांच्या उत्साहावर विरजण पडले. दहीहंडी बांधण्यासाठी लावण्यात आलेला एक लाकडी स्तंभ कोसळला. यात एका गोविंदाच्या पायाला फ्रॅक्चर, तर अनेक गोविंदा जखमी झाले. गोविंदा चढताना एक स्तंभ हालत असल्याचे तेथे उपस्थित एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दहीहंडी फोडून झाल्यानंतर पुन्हा हे सगळं करून आयोजकांना नेमके काय साध्य करायचे होते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

एरवी लहान-सहान गुन्ह्यांत कर्तव्य तत्परता दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलिस प्रशासन आता कुणाच्या दबावात आहे, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून आता उमटू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्याप्रमाणेच नेटकऱ्यांनीसुद्धा आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आता तरी पोलिस अधीक्षक कर्तव्य तत्परता दाखवतील का, हे लवकरच कळणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT