Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar : काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत, आता जागावाटपाचे काय ते सांगा !

जयेश विनायकराव गावंडे

Prakas Ambedkar : वंचित बहुजन आघाडीच्या सर्व 39 मुद्द्यांना स्वीकारण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र, आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा जागावाटपाबाबत काय समझोता झाला, हे लवकरात लवकर जाहीर करावे, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना केली.

दोन दिवसांत महाविकास आघाडीने हा निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर आज (ता. 23) अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्यानंतर वंचितकडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा मसुदा देण्यात आला होता. आता वंचितचा मसुदा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वीकारला असल्याचं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं आहे.

आंबेडकर यांनी काँग्रेसच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आंबेडकर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिघांनी आपापल्या पक्षाचा मसुदा द्यावा. म्हणजेच एकत्र येण्यासाठी त्यांचे कोणते मुद्दे आहेत. हे आम्हाला लक्षात येईल. पुढचा निर्णय घेता येईल. या तिन्ही पक्षांत जागावाटपाचा जो समझोता झालेला आहे. जागावाटपात कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा गेल्या, याची माहिती द्यावी. म्हणजेच आम्हाला राहिलेल्या किंवा कोणत्या जागा मागाव्यात, याबाबत चर्चा करता येईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी कोणत्याही माध्यमातून आमच्याशी संवाद साधावा. म्हणजेच आम्हाला ज्या जागा पाहिजेत, याचा आराखडा लवकर देता येईल. म्हणजेच सीट वाटपाचं काय ते लवकर ठरवलं जाईल. मात्र, दोन दिवसांत त्यांनी हा निर्णय घ्यावा. हा अल्टिमेटम नाही, पण विनंती आहे, असेही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेल्यानुसार त्यांनी जागांचे अॅग्रिमेंट शेअर करावे.

आम्ही अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही. केवळ निमंत्रक म्हणून बैठकीत बसत असतो, असेही आंबेडकर म्हणाले. आम्ही त्यांच्या जागावाटपाच्या समझोतामध्ये अद्याप नाही. त्यांनी एकमेकांना जागावाटप शेअर केला, तो आम्हाला शेअर करावा. याबाबत त्यांनी आमच्याशी कसं बोलावं, हे त्यांनी ठरवावं. आम्हाला किती जागा हव्या आहेत. हे अद्यापही सांगू शकत नसल्याचे आंबेडकर म्हणाले. पूर्वी दिलेला 12 जागांचा फॉर्म्युला हा चर्चेचा प्रस्ताव होता.

सध्या पक्षातील जागावाटप महत्त्वाचे असल्याने उद्धव ठाकरे यांची वकिली त्यांच्या पक्षापुरती आहे, तर शरद पवार, ठाकरे यांच्याशी माझं काहीही बोलणं झालं नाही. मात्र, आम्ही सर्व पक्ष कोणत्या इशूसाठी लढतो आहे ते कळलं पाहिजे, तर अद्यापही 27 फेब्रुवारीचं निमंत्रण आलं नाही. मात्र, आलं तर नक्की जाईल, असेही आंबेडकर म्हणाले. तिघांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला या तारखेपूर्वी शेअर करावा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT