Women Reservation Bill Sarkarnama
विदर्भ

Women Reservation Bill : महिला आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, "ओबीसींची एवढी बाजू घेता तर..."

जयेश गावंडे

Akola : महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारं विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेय घेण्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला चांगलंच धारेवर धरले आहे. आंबेडकरांनी ट्विट करीत काँग्रेसला कोंडीत पकडलं आहे.

संसदेत विशेष अधिवेशनात विधी व न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील ऐतिहासिक विधेयक मांडले. यावर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते.

विधेयकावरून काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी "मला या विधेयकात ओबीसी आरक्षणाचा समावेश पाहायला आवडेल. यामुळे भारतीय महिलांच्या मोठ्या भागाला या आरक्षणात प्रवेश मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते या विधेयकात नाही," अशी खंत व्यक्त केली आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला चांगलेच कोंडीत पकडलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींबाबत काँग्रेसलाच जबाबदार धरलं. काँग्रेस जर ओबीसीची बाजू घेत आहे तर त्यांनी या विधेयकात ओबीसींचा समावेश करण्याच्या कलमांमध्ये दुरुस्ती का केली नाही, असा सवाल काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी 'वंचित'चा 'इंडिया' आघाडीत समावेशावरून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या विरोधात प्रतिक्रिया देत काँग्रेसला कोंडीत पकडण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. आता महिला आरक्षण विधेयकावरून आंबेडकरांनी पुन्हा काँग्रेसला डिवचले आहे. काँग्रेस आणि भाजपला आंबेडकरांनी खडेबोल सुनावत महिला आरक्षण आणि सक्षमीकरणाची बिजं रोवण्याचे काम काँग्रेसने केले ना, ना भाजपने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते केले, असेही प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

श्रेयवादाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर...

महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी श्रेयवादाच्या लढाईत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या लढाईत प्रकाश आंबेडकरांनीही उडी घेतली. ओबीसींचा या आरक्षणात समावेशाच्या मुद्द्यांवरून आंबेडकरांनी काँग्रेसवर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट चर्चेत येत आहेत. ते काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT