Prahar Protest in Amravati. Sarkarnma
विदर्भ

Amravati : शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी प्रहारने केली महसूल विभागाची दशक्रिया

Amar Ghatare

Farmers Issue : आमदार बच्चू कडू यांच्या सत्ताधारी प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाची दशक्रिया करीत शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे अमरावती येथील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा महसूल प्रशासनाच्याविरोधात प्रहारने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे दशक्रिया आंदोलन सुरू केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या अहवालात तिवसा तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यांत तिवसा तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या फोटोसमोर विधिवत दशक्रिया पूजा करीत प्रहारकडून प्रशासन आणि शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अवकाळी पावसामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, हरभरा, संत्रापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येची संख्या वाढत असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात येत आहे.

गेल्या 23 नोव्हेंबरला तिवसा तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. तब्बल पाच ते सहा दिवस या अवकाळी पावसाने हाताशी आलेले पीक नष्ट झाले होते. तिवसा तालुक्यालादेखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यानंतरही तिवसा तालुक्यात महसूल विभागाने सर्वेक्षण केले नाही. सर्वेक्षणच न झाल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाच्या यादीतून तिवसा तालुक्याला वगळण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वेक्षणाअभावी तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानाच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट होऊच शकला नाही. त्यामुळे तातडीने तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी प्रहारने केली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

अॅड. ठाकूर यांनी त्यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली होती. सर्वेक्षण सुरू होते, तेव्हा अमरावतीचे पालकमंत्री झोपले होते काय, असा सवालही त्यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. अशात आता सत्तेत असलेल्या बच्चू कडू यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन व शासनाच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यावर बच्चू कडू हेदेखील सरकारच्याविरोधात प्रतिक्रिया देत आहेत. अशात शेतकऱ्यांसाठी त्यांच्या नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन अमरावती जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे. यावरून पुन्हा एकदा बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT