Ajit Pawar & Vijaygad in Nagpur. Google
विदर्भ

Nagpur Winter Session : नागपुरात सजतेय दादांचे सत्ताकेंद्र ‘विजयगड’

प्रसन्न जकाते

Maharashtra Legislature : उपराजधानी नागपूर येथे दहा दिवसांनंतर होऊ घातलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्याकडं वाटचाल करीत आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बंगल्यांमध्ये दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. अशात राज्यातील तिसरं सत्ताकेंद्र ‘विजयगड’ आलिशान करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जोमानं कामाला लागलं आहे.

मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारं हे पहिलच अधिवेशन आहे. त्यामुळे तीनही नेत्यांची सत्ता केंद्र अधिवेशन काळात उपराजधानी नागपुरात असणार आहेत. महाराष्ट्रात 1978 पासून उपमुख्यमंत्री पदाची परंपरा अस्तित्वात आहे. (PWD Step Up Work Of Bungalow Renovation For DCM Ajit Pawar During Nagpur Winter Session Of Maharashtra Legislature)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ लवकरच अधिवेशनासाठी नागपुरात मुक्कामी येणार आहे. मंत्री व अधिकाऱ्यांच्या निवासी व्यवस्था कशी असेल, याची यादीच प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नागपुरात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी देवगिरी हा बंगला देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुक्काम सिव्हिल लाइन्स परिसरात असलेल्या बंगल्यात राहणार आहे. त्याला ‘विजयगड’ असं नाव देण्यात आले आहे.

सिव्हिल लाइन्स परिसरातील हा बंगला नागपूर शहर सहपोलिस आयुक्तांचा आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या ‘प्रोटोकॉल’नुसार हा बंगला बांधकाम विभागाच्या निकषांमध्ये बसल्यानं त्याला विजयगड असं नाव देत तातडीनं नूतनीकरण हाती घेण्यात आलं आहे. लवकरच हा बंगला दादांच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे. अजितदादा विदर्भातील याच विजयगडातून राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘आपल्या’ राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी समवेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसोबत मोर्चेबांधणी करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्रिपद म्हणजे नेमकं काय?

संविधानात तसा उपमुख्यमंत्री या पदाचा उल्लेख नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल ज्याप्रमाणे अन्य मंत्र्यांची नियुक्ती करतात, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली जाते. देशात उपमुख्यमंत्रिपदाची परंपरा सर्वांत प्रथम बिहार येथून सुरू झाली. डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा हे देशातील व बिहारचे पहिले उपमुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्रिपदाचा दर्जा हा मंत्रिमंडळातील अन्य कॅबिनेट मंत्री हाच असतो. त्यांना कॅबिनेट मंत्र्याइतकेच वेतन व भत्ते मिळतात. सध्या देशात सर्वाधिक पाच उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेशात आहेत. येथे वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळातही केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे दोन उपमुख्यमंत्री आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT