Rahul Gandhi and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Naya Yatra : प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधींकडून निमंत्रण, मात्र...

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांना काँग्रस खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिल्याची माहिती आहे. मात्र यात्रेचे निमंत्रण दिले 'इंडिया' आघाडीत सहभागी होण्याचे कधी? असा प्रश्न वंचित कडून विचारला जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश 'इंडिया' आघाडीत कसा आणि कधी होणार, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राजकीय प्रश्न झाला आहे. याचं उत्तर, वंचित प्रत्यक्षात येईपर्यंत, कोणीच देऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांना लिहून 'वंचित बहुजन आघाडी'ची 'इंडिया आघाडी'मध्ये सामील होण्याची आपली इच्छा असल्याचं स्पष्टपणे सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकर यांच्या 12+12+12+12 च्या फॉर्म्युल्यानुसार राज्यातील 48 जागांसाठी समसमान वाटप व्हावे आणि प्रत्येकाच्या पदरात 12 जागा याव्यात. अशी मागणीही केली मात्र आघाडीकडून अद्यापही वंचितचं आघाडीत येण्याचं भिजत घोंगड कायम आहे. त्यामुळे प्रवेश कधी होणार हे पक्षाकडून वारंवार विचारण्यात येत आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा इंफाळपासून सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना मिळालं आहे. मात्र हे निमंत्रण फक्त 'भारत जोडो न्याय यात्रे'साठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही. अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान आंबेडकर यांना यात्रेचे निमंत्रण मिळालं आहे. त्यामुळे आघाडीत समावेशाची शक्यताही अधिक दृढ झाल्याचं यावरून बोललं जातं आहे. येणाऱ्या काळात वंचितला इंडिया आघाडीत घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राहुल गांधींच्या यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार का? हे पाहावे लागणार आहे.

यापूर्वी आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो या यात्रेवर टीका केली होती. जोडण्याचा मुद्दा काय? जे तुटलं असेल ते जोडता येते. खऱ्या अर्थाने देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे. जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही. असे आंबेडकर यांनी म्हटलं होतं. आता या यात्रेवरून आंबेडकर काय बोलतात हे पाहावे लागणार आहे.

तर वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीनवेळा कॉंग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल. असेही पक्षाकडून म्हटल्या जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT