Amravati Congress News : भारतीय जनता पार्टीकडून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे भांडवल केवळ राजकीय फायदा उठविण्यासाठी केले जात आहे. मंदीर अजून अर्धवट आहे. अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे.
चारही शंकराचार्यांनी हे जाहीरपणे सांगितले आहे. परंतु भाजपाला घाई झाली आहे. निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा ‘इव्हेंट’ केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अमरावती येथे ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीला चेन्नीथला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. रमेश चेन्नीथला म्हणाले, काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या विरोधात नाही.
सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेतेही अयोध्येला जाऊन आले आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी काँग्रेस नेते व उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सहकाऱ्यांसह अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले, असेही ते म्हणाले.
अयोध्येला ज्यांना जायचे आहे, त्याला कुणीही विरोध केलेला नाही. भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदी हे राजकीय फायद्यासाठी मंदिर उद्घाटनाचा ‘इव्हेंट’ करीत आहेत. ही बाब पूर्णत: चुकीची आहे आणि जनतेला ते माहीत आहे, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
भारत जोडो न्याय यात्रेविषयी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. या न्याय यात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही निवडणूक यात्रा नाही. देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी ही यात्रा आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहेत. ही यात्रा देशासाठी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्र काँग्रेस सक्षम आहे. सर्व नेते एकत्र आहेत. कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. भारतीय जनता पार्टी केवळ अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहे. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
विभागीय बैठकीत संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन महिन्यांपूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटींना कार्यक्रम दिला होता. त्याचा आढावाही घेतला जात आहे. अमरातीमध्ये बैठक झाली असून शेवटची बैठक मराठवाडा विभागात 29 जानेवारला लातूरमध्ये होत आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेनीथल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, अनिस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, एआयसीसी सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, सुनिल देशमुख यांच्यासह अमरावती विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.