Ravikant Tupkar. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : निवडणूक रिंगणात उतरलेले तुपकर आता करणार...

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Politics : आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरणारे रविकांत तुपकर यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. 18 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-दिल्ली-गुजरातकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या ते अडविणार आहेत.

मलकापूर रेल्वे स्थानकावर येणारी एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असे तुपकर यांनी म्हटले आहे. अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा यासह कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करीत आहेत.

एल्गार यात्रा, एल्गार महामोर्चा, मंत्रालयावर ताबा आंदोलन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक, हिवाळी अधिवेशनावर मोर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या रविकांत तुपकर यांनी पुन्हा नव्या आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे. आता ही लढाई आरपारची असेल असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता हे नवे आंदोलन 18 जानेवारीनंतर होणार आहे. तोपर्यंतचा वेळ त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 19 जानेवारीपासून रेलरोको केले जाणार आहे. मलकापूर रेल्वे स्थानकावर हे आंदोलन केले जाईल. एकही गाडी स्थानकावरून पुढे जाणार नाही. सर्वच रेल्वे गाड्या रोखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. केंद्र आणि राज्य सरकार मात्र सत्तेच्या मस्तीत आहेत. मुख्यमंत्री निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर फिरत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दिल्लीला जायला त्यांना वेळ नाही, अशी टीकाही तुपकर यांनी केली. दौरे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोपही त्यांनी केला. आता शेतकऱ्याचा संयम संपलेला आहे. 18 जानेवारीपर्यंत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करू, त्यानंतर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मलकापूर रेल्वे स्टेशनवरील एकही ट्रेन जाऊ देणार नाही, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. या घोषणेनंतर त्यांनी जिल्ह्यात सभा आणि बैठकींचा धडाकाही सुरू केला आहे. अशात आता नव्या आंदोलनाचा घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात तुपकर अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. मुख्यमंत्र्यांना सभा आणि दौरे करण्यासाठी वेळ आहे यावरून तुपकर यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे महायुतीला घेरण्यासाठी रविकांत तुपकर यांनी रणनीती आखली आहे. आंदोलनाच्या माध्यमातूनच निवडणूकीची तयारी तुपकर यांच्याकडून होणार असल्याचे चित्र तरी सध्या पाहायला मिळत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT