G N Saibaba & Nagpur High Court. Sarkarnama
विदर्भ

High Court : न्यायालयाच्या निर्णयानंतर साईबाबा यांची कारागृहातून मुक्तता

प्रसन्न जकाते

High Court : दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा अखेर कारागृहातून बाहेर आले आहेत. माओवाद्यांशी साईबाबा यांचे संबंध असल्याचे व ते देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे महाराष्ट्र सरकार सिद्ध न करू शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली. कोर्टातून निर्दोष मुक्त होताच साईबाबा यांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कारागृहातून बाहेर काढण्यात आले. साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांनाही कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर गुरुवारी (ता. सात) सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. नागपूर खंडपीठाने यूएपीएनुसार नक्षलवादी समूहांशी संबंध असल्याच्या आरोपातून जी.एन. साईबाबा आणि इतर पाच जणांच्या शिक्षेचा निर्णय रद्द ठरविला.

न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मीकी एसए मेनेजेस यांनी हा निर्णय दिला. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना 2014 मध्ये पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी पांडू नरोटे यांचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. मे 2014 मध्ये, प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक केली होती. त्यानंतर साईबाबांना दिल्ली विद्यापीठाने निलंबित केले होते. साईबाबा यांच्या विरोधात कायद्यातील गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्राध्यापक साईबाबा 90 टक्के अपंग आहेत. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामेही स्वत: करता येत नव्हती. अशात कारागृहात त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून जुलै 2015 मध्ये जामिनावर सुटका झाली होती. कालांतराने हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. साईबाबा हे शहरी नक्षलवादाशी संबंधित असल्याचा ठपका सातत्याने तपास यंत्रणांनी ठेवला होता. जी.एन. साईबाबा, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, क्रांतिकारी लोकशाही आघाडी नावाच्या संघटनेशीदेखील संबंधित होते. ते 'क्रांतिवादी लोकशाही आघाडी'चे उपसचिव होते. माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल गुप्तचर संस्थांनी 2014 मध्ये ‘रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट’ला लक्ष्य केले होते.

साईबाबा यांचा खटला सुनावणीला आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. जी.एन. साईबाबा यांचे वकील हरिष लिंगायत यांनी, तपास यंत्रणेजवळ साईबाबा यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. साईबाबा यांच्याविरोधात पोलिसांकडे काही इलेक्ट्रॉनिक पुरावे होते. साईबाबांच्या घरातूनही काही गोष्टी जप्त केल्या होत्या. तेवढेच त्यांच्याकडे होते. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुराव्याची छाननी करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही. साईबाबांच्या घरातून जप्त केलेल्या सामग्रींमध्ये कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे कोर्टाला आढळले. सुमारे दहा वर्षांपासून एखाद्या अपंग व्यक्तीला तुरुंगात डांबून ठेवणे चुकीचे असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यामुळे कोर्टाने हा सर्व युक्तिवाद ग्राह्य धरत साईबाबा व अन्य पाच जणांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.

पत्नी वसंताला भावना अनावर

साईबाबा यांच्या पत्नी गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्यासाठी लढा देत आहेत. साईबाबा कारागृहातून बाहेर आल्यानंतर वसंता म्हणाल्या की, हा प्रसंग खूपच आनंददायी व सुखद आहे. आमची मुलगी मंजिराला आता फार आनंद झाला आहे. गेली अनेक वर्षे आम्ही व साईबाबांनी खूप दु:ख सहन केले. प्रचंड वेदना सहन केल्या. साईबाबा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर वसंत आणि मंजिरा यांना भावना व आनंदाश्रू अनावर झाले होते.

Vasanta Wife of G N Saibaba

एक दशकाचा घटनाक्रम

दिल्ली विद्यापीठातील आनंद महाविद्यालय येथे जी. एन. साईबाबा हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. माओवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत त्यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. मार्च 2017 मध्ये साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अटक झाल्यापासून ते नागपूर कारागृहात होते. त्यांना एका अंधारलेल्या कोठडीत ठेवण्यात आले होते. शारीरिकदृष्ट्या 90 टक्के अपंग असल्याने साईबाबा यांना काहीही करता येत नव्हते. वयाच्या पाचव्या वर्षीच पोलिओ झाल्याने ते अपंग झाले होते. त्यांना ‘व्हीलचेअर’वरच बसून राहावे लागत होते. तुरुंगात आल्यापासून साईबाबा यांना हालचाल करता येत नसल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मज्जातंतूशी संबंधित आजार, यकृताच्या समस्या, रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास त्यांना होत होता.

कोरेगाव भीमा ‘कनेक्शन’

पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे जातीय हिंसाचार झाला होता. 1 जानेवारी 2018 रोजी हा हिंसाचार घडल्यानंतर अनेकांची नावे तपासात पुढे आली. पेशवा बाजीराव यांच्यावर ब्रिटिशांनी मिळविलेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आल्याच्या कथित घटनेनंतर हा हिंसाचार उफाळला होता. साईबाबा यांचे नावही कोरेगाव भीमा दंगलीनंतर चर्चेत आले. या दंगलीनंतर समाजातील अनेक बुद्धिजीवी लोकांना माओवादी ‘कनेक्शन’च्या नावाखाली अटक करण्यात आल्याचा आरोप आजही होत आहे. 24 जानेवारीला हे प्रकरण पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे सोपविण्यात आल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या वाढली. त्यानंतर साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच गडचिरोली येथे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याचे नावही कोरेगार भीमा दंगलीशी संबंधित लोकांमध्ये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT