Samrudhhi Mahamarg Accident Sarkarnama
विदर्भ

Samrudhhi Mahamarg Accident : बस जळून खाक झाल्यावर कसे काढले पीयूसी प्रमाणपत्र? आरटीओ अधिकारीही चक्रावले !

सरकारनामा ब्यूरो

Buldana Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सला १ जुलैच्या पहाटे दीड वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सला अपघात झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक जुलै रोजी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र काढल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर बस ‘पीयूसी’साठी यवतमाळात आलीच कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (After the accident, the bus came to Yavatmal for PUC, How?)

यवतमाळातील पीयूसी केंद्र चालकाचा हा कारनामा बघून आरटीओचे अधिकारी चक्रावले आहेत. नागपूर येथून प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सला सिंदखेडराजा हद्दीत पिंपळखुटा शिवारातील समृद्धी महामार्गावर अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा कोळसा झाला. नातेवाइकांना आपल्या लाडक्यांचा अखेरचा चेहराही बघता आला नाही.

तरुणांसह चिमुकल्या मुलीचा जीव गेल्याने अजूनही या अपघाताच्या आठवणीने समाजमन हळहळत आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आटण्यापूर्वीच अपघातातील दुसरे रहस्य बाहेर आले आहे. एमएच २९ बीई १८१९ या क्रमांकाच्या बसची कुंडली अपघातानंतर बाहेर काढण्यात आली. नोंदणी २४ जानेवारी २०२० रोजी झाली आहे. फिटनेस कालावधी १० मार्च २०२४पर्यंत दाखविण्यात येत आहे. पीयूसी व्हॅलिड ३० जून २०२४पर्यंत दाखविण्यात येत आहे.

मुदत संपल्यावर एक जुलैला पीयूसी प्रमाणपत्र काढण्यात आले. सदर ट्रॅव्हल्स प्रगती भास्कर दरणे या महिलेच्या नावावर आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचे संचालक म्हणून वीरेंद्र दरणे समोर आले होते. त्यांनी सर्व कागदपत्रे ओके असल्याचा दावा केला होता. पीयूसी प्रमाणपत्र अपघात झाल्यावर यवतमाळातील (Yavatmal) एका केंद्रातून काढण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पीयूसी प्रमाणपत्र काढायचे असल्यास शासनमान्य पीयूसी केंद्रावर कागदपत्रांसह वाहन आणणे आवश्यक आहे. मात्र, अपघातात (Accident) ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्यावर केंद्रातून पीयूसी प्रमाणपत्र देण्यात कसे आले, या प्रश्‍नाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी चक्रावले आहेत. यासंदर्भात ट्रॅव्हल्समालक व पीयूसी केंद्रचालकांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत.

एक जुलै रोजी अपघातग्रस्त ‘ट्रॅव्हल्स’ची परस्पर पीयूसी काढण्यात आली आहे. यासंदर्भात ट्रॅव्हल्स मालक व पीयूसी केंद्रचालक अशा दोघांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचे म्हणणे ऐकण्यात येईल. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) ज्ञानेश्‍वर हिरडे यांनी सांगितले.

प्रदूषण नियमालाच हरताळ..

वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणाला लगाम लावण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शासनमान्य केंद्रातून वाहन व कागदपत्रांची तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर पीयूसी काढण्यात आल्याने नियमालाच हरताळ फासण्यात आल्याचे चिंताजनक चित्र आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT