Sandeep Joshi nitin gadkari And devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

Nagpur BJP MLA: आधी तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करुन खळबळ उडवली; पण गडकरी-फडणवीसांच्या 'लाडक्या' आमदारानं 2 महिन्यांतच भूमिका बदलली

Nagpur Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक तसेच विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी तडकाफडकी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे विदर्भाचं राजकारण ढवळून निघालं होतं.

Deepak Kulkarni

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक तसेच विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी तडकाफडकी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे विदर्भाचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यांनी सुरू असलेली विधान परिषदेची टर्म संपल्यानंतर आपण पक्षाकडे कोणतेही पद मागणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

तसेच त्यावेळी त्यांनी निवृत्तीच्या निर्णयापाठीमागची भूमिका स्पष्ट करतानाच सध्याच्या राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत रोखठोक भूमिका मांडली होती. विशेष म्हणजे त्यांच्या या भूमिकेचं सर्वच स्तरांतून कौतुकही झालं होतं. पण आता त्याच जोशींनी आपल्या निर्णयावरुन यू टर्न घेतला आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विश्वासू नेते मानले जातात. पण त्यांनी आमदारकीची टर्म संपण्याआधीच जानेवारी महिन्यात भावनिक पत्र लिहित आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करत खळबळ उडवून दिली होती. पण आता त्यांनी आता आपला हा निर्णय बदलला आहे.

संदीप जोशी यांनी ते आमदारकीची टर्म संपल्यानंतर पुढील सहा महिने ब्रेक घेणार असल्याचं सांगितलं आहे. या ब्रेकनंतर पुन्हा एकदा ते नव्या उत्साहानं सक्रि राजकारणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेनंतर घेतल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे.

आमदार जोशी म्हणाले, आपल्या या निर्णयाबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री माझे मित्र, बंधू आणि मार्गदर्शक असून त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच मी हा निर्णय घेतला आहे. पण आता फडणवीसांच्या सूचनेनुसार सहा महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा सक्रिय होणार आहे, असं जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. याचवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही वैयक्तिक संवाद साधत राजकारणातून दूर जाऊ नये, असा सल्ला दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

भाजप आमदार जोशी यांनी 13 मे रोजी आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील सहा महिने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असून या कालावधीत विश्रांती आणि आत्मचिंतन करणार असल्याचं म्हटलं आहे. काही शारीरिक अडचणी आणि वैयक्तिक कारणांमुळे आपण हा ब्रेक घेण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचं कबूल केलं.

माझ्यासाठी कार्यकर्त्यांची भावना अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या आग्रहामुळेच आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय बदलला असल्याची भूमिकाही आमदार संदीप जोशी यांनी सांगितलं. पण सहा महिन्यांच्या काळात आपण स्वतःला नव्यानं तयार करणार असून आरोग्याकडेही लक्ष देणार आहोत, असंही जोशी म्हणाले.

मात्र आता त्यांनी हा निर्णय तात्पुरता असल्याचे स्पष्ट करत पूर्णपणे राजकारण सोडण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे. १३ मे रोजी त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढील सहा महिने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असून हा काळ विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संदीप जोशी यांनी सहा महिन्यांच्या या ब्रेकदरम्यान मी पूर्णपणे निष्क्रिय राहणार नसून समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.याचवेळी राजकारणापासून थोडा काळ दूर राहणार असलो, तरी समाजाशी असलेले नातं कायम राहणार आहे. पण हा ब्रेक काही शारीरिक अडचणी आणि वैयक्तिक कारणांमुळे घेण्याची गरज भासली. पण हा कायमस्वरूपी संन्यास नसून तात्पुरती विश्रांती असल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे.

जोशींनी निवृत्तीच्या घोषणेच्या पत्रात काय होतं...?

भाजपाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यात त्यांनी ... आता मला थांबायचंय ! नमस्कार, हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत असल्याचं म्हटलं होतं.

मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे. मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मा. ना. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत असल्याचं जोशी यांनी म्हटलं होतं.

माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी.

13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन. राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करत असल्याचं जोशी यांनी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT