नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिलं स्मार्ट व इंटेलिजंट गाव घोषित झालं आहे.
येथे स्मार्ट सिंचन, ड्रोन फवारणी, बँक ऑन व्हिल, डिजिटल आरोग्य व शिक्षणासह १८ सेवा उपलब्ध आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ३५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याची घोषणा केली आहे.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव ठरले आहे. भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून या गावामध्ये आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा एकूण 18 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सातनवरीचे समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभारून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यत येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास तीन हजार 500 गावे स्मार्ट व इंटेलिजंट केली जाणार आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत 24 कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येऊन स्मार्ट गावाची निर्मिती केली जात आहे. या गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींच्या उपयोगाने माती परिक्षण, फवारणी, खते आदींचे योग्य नियोजन करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील.
गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसिन आदींचा उपयोग होवून गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होणार आहे. गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धीमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होवून वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या सेवांचा योग्य प्रकारे वापर करत येत्या वर्षात सातनवरी गावाने देशातील सर्वात प्रगतीशील गाव म्हणून नावलौकिक मिळावावे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया आदी महत्वाचे प्रकल्प देशात राबविले. यालाच पुढे घेवून जात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात स्मार्ट व इंटेलिजंट गाव तयार करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला व नागपूर जिल्ह्याला हा मान मिळाला ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजनमधून 1200 कोटींचा भरीव निधी मंजूर केला व यामाध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू असून सातनवरी गावाच्या माध्यमातून देशात विकसित ग्रामीण भागासाठी डिजिटल गावाची सुरूवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
व्हाईस कंपनीचे प्रमुख राकेश कुमार भटनागर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर स्मार्ट व इंटेलिजंट गाव उपक्रमांतर्गत सातनवरी गावात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या विविध सोई सुविधांबाबत माहिती देत सादरीकरण केले.
प्रश्न 1: सातनवरी गाव विशेष का आहे?
उत्तर: सातनवरी हे देशातील पहिलं स्मार्ट व इंटेलिजंट गाव असून येथे १८ डिजिटल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
प्रश्न 2: या गावात कोणत्या सेवा उपलब्ध आहेत?
उत्तर: स्मार्ट सिंचन, ड्रोन फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी, आरोग्य आणि शिक्षण यांसह १८ सेवा उपलब्ध आहेत.
प्रश्न 3: महाराष्ट्रातील किती गावे स्मार्ट होणार आहेत?
उत्तर: पहिल्या टप्प्यात राज्यातील ३५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट बनवण्याची योजना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.