Violent Protest at Crop Insurance Company Office at Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांची पीकविमा कंपनी कार्यालयात तोडफोड

संदीप रायपूरे

Shiv Sena Uddhav Thackerya Group : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.अशात नुकसानधारक शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळं संतप्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

अकोला, अमरावतीनंतर आता ठाकरे गटाच्या हिंसक आंदोलनाचे लोण चंद्रपूर येथेही पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. (Shiv Sena Uddhav Thackeray Group Activists Vandalized Office Of Insurance Company In Chandrapur On The Issue Of Crop Insurance)

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं धरणे आंदोलन केलं. महसूल अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. अधिकाऱ्यांना तातडीनं मदत देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. त्यानंतर कार्यवाही न झाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी विमा कंपनीचं कार्यालय गाठत तेथे तोडफोड केली. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उतरं दिल्याचा आरोप तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांवर शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. यंदा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीमुळं मोठं संकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. त्यानंतरही पीकविमा कंपन्या मदत करताना दिसत नाहीत. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. विमा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळं ठाकरे गटानं यासाठी आंदोलन सुरू केलंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनानंतरही प्रशासकीय यंत्रणा झोपेचं सोंग घेत असल्यानं अखेर ठाकरे गटानं हिंसक पवित्रा घेतला. संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. युवा सेनेचे विक्रांत सहारे, उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव, उपजिल्हा प्रमुख शालिक फाले, बल्लारपूरचे शहर प्रमुख प्रकाश पाठक, माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, तालुका प्रमुख संतोष नरुले, मूलचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, गोंडपिपरीचे तालुका प्रमुख सूरज माडुरवार यांनी या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विमा कंपनीचं कार्यालय गाठलं. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांकडं कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केल्यानंतरही प्रशासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार नसले तर आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, त्याला प्रशासन व विमा कंपन्यांचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही चंद्रपूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलाय. त्यामुळं आगामी काळात पीकविम्याच्या मुद्द्यावर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT