Ravi Rana - Devendra Fadnavis - Navneet Rana.jpg Sarkarnama
विदर्भ

Shivsena Vs Navneet Rana : 'नवनीत राणा यांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा...'; शिंदेंच्या नेत्याचा भाजपला इशारा

Deepak Kulkarni

Maharashtra Politics : महायुतीत असूनही लोकसभा निकालानंतर भाजप -शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर हा वाद आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याचाही यात समावेश आहे. अमरावती मतदारसंघात लोकसभेला भाजपने पूर्ण ताकद पणाला लावूनही नवनीत राणांना पराभवाला सामोरे जावे लागले.या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी भाजपने राणा यांना आवरावं किंवा त्यांना महायुतीतून बाहेर काढावं अशा शब्दांत उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.तसेच आम्हांला वेगळा निर्णय घ्यायला भाग पाडू नये असा इशाराही दिला आहे.

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी 'राज्यपाल'पदाचा दिलेला शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाळला नाही असा गंभीर आरोप करत महायुतीलाच अल्टिमेटम दिला आहे.आता आनंदराव यांच्यापाठोपाठ आता त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनीही नवनीत राणांविरोधात टीकेची धार आणखी टोकदार केली आहे.

अभिजीत अडसूळ यांनी बुधवारी (ता.7)मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अमरावतीच्या राजकारणावर थेट भाष्य केले.त्यांनी नवनीत राणांविषयी दंड थोपटले आहे.ते म्हणाले, राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात घ्या.शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं रोखठोक विधान अभिजीत अडसूळ यांनी केले आहे.

कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी यावेळी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला.ते म्हणाले, आमदार रवी राणा हे नेहमी वाचाळपणे बोलतात.राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं असल्याचं खळबळजनक दावाही त्यांनी केला. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबंध नाही. महायुतीत खडा टाकण्याचं काम ते करत आहे.बनावट प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला,त्यामुळेच जनतेनेही त्यांना जागा दाखवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतली आहे. तरी राज्यपाल पदाच्या यादीत आनंदराव आडसूळ यांचं नाव का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचं नाव का डावललं गेलं?असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची सलही अभिजीत अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवली होती.

अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्याचा इतिहासच काढला. ते म्हणाले,राणा यांचा इतिहास पाहा.सत्तेत असणार्‍या पक्षाचे नेते यांचे देव असतात. बच्चू कडू हे रवी राणांमुळेच महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा. ब्लॅकमेलिंग करणं हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं असल्याची स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT